बावधन, दि. 24 (सागर येवले) – महापालिका समाविष्ट गावांमध्ये बावधन बुद्रुकचा समावेश झाला. मात्र, गावाच्या विकासाला गती मिळण्याएवजी खिळ बसली. मागील वर्षभरापासून निधीच नसल्यामुळे विकास होणार कसा? गावचे प्रश्न जैसे थे, करांचा बोजा मात्र वाढला, अशी स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे महापालिकेपेक्षा आमची ग्रामपंचायतच बरी, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. याच कारणातून महापालिकेची नको ग्रामपंचायतीची निवडणूक घ्या, अशी मागणी होऊ लागली आहे.
पुणे महानगपालिकेत 23 गावे समविष्ट करण्यात आली. यामध्ये बावधन बुद्रुक घेण्यात आले. हे गाव शहर आणि महामार्गालगत असल्यामुळे विकास वेगाने झाला. लोकसंख्या वाढली, मात्र त्या तुलनेत पाणी, कचरा, आरोग्य मूलभूत सुविधा पुरविण्यात पालिका अपयशी ठरली. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर गाव “स्मार्ट’ होणार. सर्व सोयी-सुविधा मिळणार, अशी अपेक्षा असताना गेल्या वर्षभरात दमडीचाही निधी आला नाही. याबाबत येथील ग्रामपंचायत माजी सदस्य सुर्यकांत भुंडे, अभिजीत दगडे यासह नागरिकांनी प्रतिक्रिया देत, निधी मिळावा, अशी मागणी केली आहे.
महापालिकेत गाव जाण्याची ही तिसरी वेळ. पालिकेत येऊन सहा महिने झाले तरी पाणी, कचरा किंवा अन्य कोणतीच समस्या सुटलेली नाही. ग्रामपंचायतीकडून ज्या सुविधा दिल्या जात होत्या, त्याच सुविधा महापालिका देते. उत्पन्न काहीच नाही टॅक्स मात्र भरमसाठा वाढला आहे.आमची ग्रामपंचायतच बरी होती.
– बबनराव दगडे पाटील, माजी सरपंच
गाव महापालिकेत आल्यामुळे नक्कीच गावाचा विकास होईल. गावातील पाण्याचा प्रश्न सुटेल, याबाबत लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होईल. परंतु, सध्या प्रशासक असल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. महापालिका निवडणुकीनंर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकासाला गती मिळू शकेल.
– दिलीप वेडेपाटील, माजी नगरसेवक
ग्रामपंचायत होती त्यावेळी कोणतेही काम येथे जागच्या जागी होत होते. मात्र, आता पाणी, कचरा, टॅक्स प्रत्येक कामासाठी महापालिका किंवा क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे प्रशासकांनी समाविष्ट गावात सर्व यंत्रणा सक्षम करावी, नागरिकांना होणारा मनस्ताप थांबवावा.
– मंदार घुले पाटील, स्थानिक नागरिक
ज्या अपेक्षेने गावे पालिकेत समाविष्ट झाली, त्या दृष्टीने गावात विकासकामे झालेली नाहीत. ग्रामपंचायतीला निधी कमी होता, पालिकेत निधी मिळेल आणि विकासाला चालना मिळेल. मात्र, गाव पालिकेत आले आणि विकास थांबला. टॅक्स घेतला जातो, मात्र विकास नाही. पाण्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.
– किरण दगडे, माजी नगरसेवक