देशपातळीवर उच्च साखर उतारा विभागाकडून दिल्लीत सन्मान
अकलूज- श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांचा देशपातळीवरील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नवी दिल्ली येथील एनसीयूआय सभागृहात सीएसीपीचे चेअरमन विजय शर्मा, फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आणि खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कल्लाप्पा आवाडे, उपाध्यक्ष केतन पटेल कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार कारखान्याच्या वतीने ज्येष्ठ संचालक आ. प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष वसंत देशमुख, कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, दिनकरराव मोरे, दिलीप चव्हाण, हरिश गायकवाड, सुरेश आगवणे, बाळासाहेब यलमार, शिवाजी गवळी,तानाजी वाघमोडे, वर्क्स मॅनेजर आर. बी. पाटील, एम. आर. कुलकर्णी, रवींद्र काकडे, तानाजी भोसले यांनी स्वीकारला. कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 मध्ये 105.52 टक्के कार्यक्षमतेचा वापर, जिल्ह्यात सर्वाधिक 11.43 टक्के साखर उतारा, एकूण वाया जाणारे साखरेचे प्रमाण 1.81 टक्के, मिलहाऊसची कार्यक्षमता 96.08 टक्के, स्टिमचा वापर 39 टक्के, बंद वेळचे प्रमाण 1.85 टक्के, साखरेचा दर्जा 59 एक्यूमसा, बी हेवीसाठी एथेनॉल निर्मिती, सांडपाणी प्रक्रियेसाठी ईएसपी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर, पाणी व वीज बचत, त्याचप्रमाणे कारखान्याने बॉयलरसाठी इंधन म्हणून ऊस तोडणी नंतर वाया जाणाऱ्या पाचटाचा उपयोग करून बगॅसची बचत केली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सर्व बाबींचा विचार करून महासंघाने तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार दिला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक व आ. प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनखाली कारखान्याची यशस्वी घौडदौड सुरू असून, आजपर्यंत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील 34 पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाकडून मानाचा समजला जाणारा सहकार भूषण व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचा समावेश असल्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले. तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार मिळालेबद्दल सुधाकरपंत परिचारक यांनी उपाध्यक्ष वसंत देशमुख, कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
- “पांडुरंग’चे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी सभासद शेतकऱ्यांचे नेहमीच हित जोपासत आजपर्यंत उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम जोपासली आहे. सभासद शेतकरी व कामगार यांच्या योगदानामुळेच गेल्या हंगामात चांगले काम करता आले आणि त्यामुळे कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचा पुरस्कार मिळाला आहे.
-यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक