वर्ष संपत आलं. 31 डिसेंबर हा दिवस जागरणाचा म्हणजे पावभाजी खाऊन, धांगडधिंगा करत, मोठ्यानं ओरडत, गाणी लावून, मद्यचषक (दारूचे प्याले) रिकामे करत एकमेकांना “हॅप्पी न्यू ईयर’ म्हणत मिठ्या मारण्याचा. अर्थात, हे 31 डिसेंबरचं जागरणच सगळ्यांच्या जवळचं आणि जास्तीत जास्त ओळखीचं आहे. पण खरं जागरण? फक्त डोळे उघडे राहणं? न झोपणं? नेमकं काय? न झोपणं, रात्र जागवणं हा एक सामान्य अर्थ. बऱ्याच दिवसांनी जवळचे नातलग, प्रिय मित्रमंडळी भेटली तर गप्पा मारत, हसत खिदळत, चहा कॉफी पित उत्तररात्र कधी उजाडते ते कळतच नाही. दुसरं म्हणजे प्रोजेक्ट लिहिताना किंवा वाचून, लिहून अभ्यास करताना मेडिकल, इंजिनियरिंग, आर्किटेक्चर किंवा परीक्षा तोंडावर आल्यावर आदल्या दिवशी जागून पुस्तक तोंडपाठ करणारे नव्या जुन्या पिढीतले अशक्य विद्यार्थी यांना जागरण झालं म्हणावं का? कारण यांच्या पापण्या उघड्या असतात पण डोळे कधी उघडत नाहीत.
महापालिकेच्या सगळ्या बागा उत्साही लोकांनी भरून गेलेल्या दिसतात. नेमकं जागरण म्हणजे काय? ते कसं होतं? कोण करतं? वर्षअखेरीच्या रात्री मी “जागरण’ करतो. म्हणजे काय? माझी खूप वर्षांची सवय आहे. ती म्हणजे वर्षभरात काय कमावलं? काय गमावलं? काय टाळता आलं असतं? काय करता आलं असतं? या सगळ्याचा चौकस ताळेबंद अगोदर मनाशी आणि नंतर कागदावर मांडणं. वैयक्तिक नाती, मानापमान, लेख, नाट्यप्रयोग, पत्रकारितेतील लेख, प्रवास, अध्यात्मातील प्रयोग खूप गोष्टींचा आढावा घ्यायचा असतो.
जवळपास सगळी किंवा नेक वृत्तपत्रं वर्षभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी, भाष्यं, सदरं, छायाचित्र अशा अनेक प्रकारच्या नोंदी घेत असतात. खरं तर वर्षभर म्हणजे माणसाच्या संपूर्ण आयुष्यात किंवा सृष्टीच्या वाटचालीत तर काहीच नाही. फक्त सूर्याभोवतीची पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. अर्थात पृथ्वी फिरतच राहणार असते, सूर्य क्षितिजावर उगवताना दिसतोय.
मग नित्य नवा दीस। जागृतीचा कधी उजाडणार? तो तसा उजाडणं हेच जागरण-
आमच्या गुरूंनी एक गोष्ट सांगितली होती. बंगालमधील एक न्यायाधीश निवृत्त झाल्यावर रोज सकाळी हातात काठी घेऊन फिरायला जात. ते एकदा असेच चालले होते. हातात काठी फिरवत होते. अचानक वाटेवरच्या एका घरातून एक आई मुलाला उठवत असल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. ती म्हणत होती, “अरे बाळा, सूर्य उजाडला. आतातरी ऊठ. अजून किती वेळ झोपून राहायचंय?’ आणि आईचं आपल्या मुलाला उठवणं ते शब्द ऐकून तेच “जागे’ झाले. मग तसेच पुढं जंगलात निघून गेले आणि अध्यात्माच्या मार्गाला लागले.
भले कोणी जंगलात जावो किंवा न जावो पण जागं होणं मात्र महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण झोपतच काम करतो, इतरांचा प्रभाव स्वतःवर वागवतो. आपण ते यांत्रिकपणे (रोबोसारखं) करतो, दुसऱ्याची नक्कल म्हणून करतो, पाप-पुण्य, शुभ-अशुभ नावाखाली करतो. पण ते करून मिळणार काय? ते करून फायदा होणार आहे का? नाही झाला तर दुसरा पर्याय काय? असे प्रश्न आपल्या मनात निर्माण व्हायला हवेत. ते निर्माण होणं हेच जागरण झाल्याचं लक्षण आहे. आपणच आपलं मन जागं ठेवलं पाहिजे. शरीर एकवेळ जागं राहू शकतं कदाचित झोपूही शकतं. पण एकदा जाग आलेलं मन कधीच झोपत नाही. तलवार घेऊन मारायला आलेला असतानाही जागतं मन शरीराला जागं करतं आणि प्राण वाचतो. जागरण होतं ते नेहमी मनाचं आणि पुढंही मनाचंच होत राहील. नव्या वर्षाच्या निमित्तानं आपणही रोजचं जागरण करण्याचा संकल्प करू. मनाचं जागरण थोंड अवघड असलं तरी शक्य नक्की नाही.
सहजानंद