-अमित डोंगरे
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर दाखल झालेल्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिका गमवावी लागली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावल्यावर आता संघ तिसरा सामना खेळणार आहे. हा सामना जिंकत व्हाइटवॉश टाळण्यात तरी विराट कोहलीचा संघ यशस्वी होणार का असा प्रश्न पडला आहे.
जर या मालिकेत व्हाइटवॉश मिळाला तर यंदाच्या वर्षात टी-20 व कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही ही नामुष्की पत्करणारा पहिलाच संघ म्हणून भारतीय संघ नकोशा विक्रमाचा धनी बनेल. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच देशात टी-20 पाठोपाठ कसोटी मालिकेतही ही नामुष्की पत्करली होती.
त्यावेळी मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका पूर्ण होऊ शकली नाही व त्यानंतर भारतासह जगभरात करोनाचा धोका वाढला व जागतिक क्रिकेटसह संपूर्ण जगही ठप्प झाले. त्यानंतर अमिरातीत आयपीएल स्पर्धा खेळवण्यात आली व क्रिकेट रुळावर येत असल्याची ग्वाही मिळाली.
त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाला. खरेतर कागदावर बलाढ्य समजली जात असलेली भारतीय फलंदाजी व त्यानुरूप भेदक असलेली भारतीय गोलंदाजी कांगारूंची त्यांच्याच भूमीवर शिकार करेल अशी अपेक्षा बाळगली जात होती. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसले व बलाढ्य फलंदाजी व तगडी गोलंदाजी असलेल्या भारतीय संघाने सपशेल नांगी टाकली.
या दौऱ्याला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेने प्रारंभ झाला व पहिले दोन सामने गमावून भारतीय संघ व्हाइटवॉशच्या उंबरठ्यावर उभा आहे. तसे पाहायला गेले तर भारताची फलंदाजी आज जगात सर्वात बलाढ्य मानली जाते.
सलामीला शिखर धवन व मयंक आग्रवाल, कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर अशी भक्कम मधली फळी. त्यानंतर हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजाहे दोन भरात असलेले अष्टपैलू म्हणजे सात फलंदाज संघात आहेत. ही फलंदाजी जगातील कोणत्याही दर्जाची गोलंदाजी उद्ध्वस्त करू शकते. या मालिकेत मात्र, हातातोंडाशी आलेले विजय हातातून निसटल्याचे दिसले.
अननुभवी फलंदाजी हेच या पराभवाचे मूळ कारण मानले जात असले तरीही बेजबाबदार वृत्ती, अनावश्यक धोका पत्करून केलेली फलंदाजी व सदोष नेतृत्व ही देखील या पराभवांची कारणे आहेत. यंदाची आयपीएल स्पर्धा गाजवलेले व भरात असलेले आग्रवाल, राहुल, अय्यर व पंड्या हे फलंदाज स्थिरावल्यानंतरही अत्यंत स्वस्तात बाद झालेले पाहायला मिळाले. त्यामुळेच या मालिकेचा निकाल भारताच्या विरोधात लागला. हे फलंदाज आपली जबाबदारी कधी ओळखणार असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे.
जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज कोहली देखील धावांसाठी चाचपडत असलेला पाहायला मिळाला याचाच त्रास जास्त आहे. एखाद्या मालिकेत फलंदाजी ढेपाळली तर समजू शकतो. इथे मात्र, फलंदाजीसह गोलंदाजी व क्षेत्ररक्षणही गचाळ झालेले पाहायला मिळाले. इतकेच नव्हे तर, जागतिक दर्जाची गोलंदाजी अत्यंत दिशाहीन झालेली दिसली.
लॉ ऑफ अव्हरेजेसचा फटका बसला असे म्हणावे तर या पूर्वी यंदाच्या मोसमात भारताचा करोनानंतरचा हा पहिलाच दौरा आहे. तरीही असे पराभव अनाकलनिय वाटतात. जसप्रीत बुमराह, महंमद शमी, यजुवेंद्र चहल ही गोलंदाजी अपयशी ठरू शकते हे पटत नाही. पण तसेच घडले आहे. आता त्याचे कारण कोहली जे सांगत आहे तेच आहे का आणखी काही ते स्पष्ट होणेच बाकी आहे.
संघात कोहलीच्या काही निर्णयांवरून नाराजी आहे तसेच संघात बेबनाव आहे असे संकेत मिळाले असले तरीही त्यात किती तथ्य आहे ते लवकरच कळेल मात्र, सध्या तरी भारतीय संघाला सुर गवसावा व निदान व्हाइटवॉश तरी टाळला जावा हीच अपेक्षा आहे.