-माधव विद्वांस
भयकथा लेखक नारायण गोपाळ धारप यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म वर्ष 1925 मध्ये झाला. त्यांची जन्मतारीख उपलब्ध नाही. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी.एस्सी.टेक पदवी मिळवली होती. त्यानंतर अनेक छोट्यामोठ्या नोकऱ्या त्यांनी केल्या.
व्यवसायानिमित्त त्यांनी काही काळ परदेशात वास्तव्य केले. (काही ठिकाणी आफ्रिका तर काही ठिकाणी अमेरिका असे दाखविले जाते.) त्यानंतर ते भारतात आले व पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला.त्यांनी वर्ष 1951 मध्ये आपले लेखन सुरू केले. “अघटित’ हे नारायण धारप यांचे सर्वांत पहिले पुस्तक प्रकाशित झाले व त्यानंतर त्यांनी अत्रारचा फास, अंधारयात्रा अशी आणखीन दोन पुस्तके प्रकाशित केली ती पण वाचकांच्या पसंतीस उतरली.
वर्ष 1962 मध्ये “अनोळखी दिशा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला व त्यानंतर त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या पुस्तकांच्या हजारो प्रति खपल्या. प्रत्येक रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपवर ह्या प्रति विकल्या जायच्या. कंटाळवाण्या प्रवासात वाचकांना त्यांच्या पुस्तकांचा आधार वाटत असे. त्यांनी सुमारे 125 पुस्तके लिहिली, त्यात प्रामुख्याने भयकथा व गूढकथा आहेत. 9 विज्ञानकथा त्यांनी लिहिल्या तसेच एक नाटकही लिहिले.
त्यांच्या अनेक कथा ह्या मूळ इंग्रजी कथांचे मराठी रूपांतर असायच्या.स्टीफन किंग ह्यांच्या “इट’ पुस्तकावरून त्यांनी “शपथ’ ही कथा रूपांतरित केली. स्पेस ब्रिज या कथेचे त्यांनी “अवकाशाशी जडले नाते’ या नावाने मराठीत रूपांतरित केले. मूळच्या इंग्रजीमधील पुस्तकांचे भाषांतर करणे सोपे वाटत असले तरी मराठी साहित्यिक शैलीत सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणारे गूढकथांचे लेखन करणे खरेच खूप अवघड आहे. कारण धारप यांनी कथा लिहिताना भारतीय संस्कृतीचे, लोकांच्यात देव, भूत यांच्या कल्पनांचा असलेला पगडा लक्षात घेतला होता. उत्कंठा, भय व अमानवी शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव त्यांच्या गोष्टी वाचताना अनुभवता येतात. त्यामुळेच त्यांचे लेखन वाचकांना भावले.
मानवी जीवन खूप गुंतागुंतीचे आहे. पुढच्या क्षणी काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे अचानक समोर घडलेल्या अचंबित घटनेमुळे माणसाच्या भावनांचा विचार करून त्याच्या होणाऱ्या मनस्थितीचे अचूक दर्शन त्यांच्या लेखनात आढळते. माणूस ठरवितो एक आणि घडते भलतेच असे बरेचदा होते. एखाद्याच्या जीवनाला व वर्तनाला त्यामुळे बसणारी कलाटणी त्यांनी आपल्या अनेक कथांतून मांडली आहे. त्यांच्या कथांमध्ये समर्थ, अप्पा जोशी, कृष्णचंद्र, पंत बहुतेक वेळा ही मध्यवर्ती पात्रे दाखविली आहेत.
समर्थ हे त्यांचे मध्यवर्ती पात्र संकटाच्या वेळी त्याच्याकडे असलेल्या असाधारण शक्तीच्या जोरावर लोकांना मदत करते असे दाखविले. त्यामुळे एखाद्या हिरोप्रमाणे तो वाचकांना वाटतो. त्यांचे कथानक बहुधा वाईटाकडून चांगल्याकडे असे सकारात्मक शेवटाकडे जाते. छोट्या पडद्यावरही त्यांच्या कथानकांना स्थान मिळाले होते.
पाच दशके आपल्या वाचकांना अनवट वाटेवरील लेखनाने मोहित करणारे धारप यांना अखेरच्या काळात फुफ्फुसांचा आजार जडला होता. त्यात न्यूमोनिया झाल्यामुळे 18 ऑगस्ट 2008 रोजी पुणे येथे या प्रतिभासंपन्न लेखकाचे निधन झाले.