-अमित डोंगरे
एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिकेत विजयी झालेल्या भारतीय संघाला आजपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेतही वर्चस्व गाजवायचे असेल तर आता नाही तर कधीच नाही या वाक्याचे गांभीर्य लक्षात घेत खेळ करावा लागेल. कर्णधार विराट कोहली आणि कंपनी कागदावर तर बलाढ्य दिसत असली तरीही काहीवेळ त्यांना परदेश दौऱ्यावर गेल्यावर पर्यटक म्हणून नाव गाजवण्याची लहर येते.
मुळातच सुरुवातीपासून म्हणजे जवळपास 90 वर्षांपासून भारतीय संघाकडे क्रिकेटपटू म्हणून पाहण्यापेक्षा पर्यटक म्हणूनच पाहिले जात होते. त्यानंतर 1970 च्या दशकापासून यात बदल झाला. असो, इतिहासात डोकावण्याची अजिबात इच्छा नाही. आजपासून सुरू होत असलेल्या मालिकेत भारतीय संघ कसा खेळेल याबाबत प्रत्येक खेळाडूने विचार केला पाहिजे.
भारतीय संघात स्थान मिळणे किती महत्त्वाचे असते याचीही कल्पना प्रत्येकाला असलीच पाहिजे. 130 कोटी लोकसंख्येच्या या देशात प्रचंड स्पर्धा आहे. त्यातही मूळ संघातील काही खेळाडूंचे स्थान निश्चितच असते केवळ एखाद दोन जागांसाठी निवड समितीला बुद्धिबळ खेळावे लागते.
आजच्या संघातही शिखर धवन, कर्णधार कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, महंमद शमी, वृद्धिमान साहा, हनुमा विहारी हे नऊ खेळाडू निश्चित राहणार. धवनसह डावाची सुरुवात करण्यासाठी शुभमन गिलच्या जागी पृथ्वी शॉ याला संधी दिली गेली असली तरीही त्याला सुर गवसेल का, हा खरा प्रश्न आहे.
ही कसोटी दिवस-रात्र पद्धतीने तसेच गुलाबी चेंडूने खेळली जाणार असल्याने सायंकाळी मैदानावर पडत असलेल्या दवामुळे गोलंदाजांना चेंडू ग्रीप करताना त्रास होणार असून त्यासाठीही बुमराह व शमीचा अनुभव महत्त्वाचा ठरेल.
क्षेत्ररक्षकांना गुलाबी चेंडू सातत्याने साईट होत नाही त्यामुळे उंच उडालेला झेल तसेच रिफ्लेक्शन झेल घेताना तारांबळ उडण्याचीही शक्यता आहे. कर्णधार कोहलीने एकदिवसीय सामन्यांसह टी-20 सामन्यांतही काही सोपे झेल सोडले होते. खुद्द कर्णधारच ढुंढो ढुंढो करत असेल तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करणार.
असो ऑस्ट्रेलियाची संमिश्र अनुभव असलेली फलंदाजी व भारताची गोलंदाजी आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी व भारताची भक्कम फलंदाजी असा हा सामना रंगेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्यातच त्यांच्या संघात या सामन्यासाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारतीय संघाला दिलासा मिळू शकतो. या मालिकेतील चार कसोटींपैकी केवळ याच कसोटीत कोहली खेळणार असून त्यानंतर पालकत्व रजेवर तो मायदेशी परतणार आहे.
संघात रोहित शर्माही पहिल्या दोन कसोटींसाठी नसेल, त्यामुळे ज्या खेळाडूंना संधी मिळेल त्यांनी त्याचे सोने केले पाहिजे अशी किमान अपेक्षा आहे. परदेशात खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिलाच सामना जिंकला तर उर्वरित मालिकेत वर्चस्व राखता येते. त्यामुळे याचा लाभ घेत पहिल्याच सामन्यात वर्चस्व प्रस्थापित करण्याची आलेली नामी संधी भारताने सोडू नये. मिळालेल्या संधीचे सोने कले पाहिजे, कारण आता नाही तर कधीच नाही.