सिडनी : हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या झुंजार आणि चिवट खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आलं. ( Australia vs India third test Match drawn ) या दोघांनी खोळपट्टीवर टिकून राहत ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना केला.
विहारीने 161 चेंडूत नाबाद 23 तर रवीचंद्रन अश्विनने 128 चेंडूत 39 धावांची खेळी करत भारताचा पराभव टाळला. हा सामना अनिर्णित राहिल्याने मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना 15 ते 19 दरम्यान ब्रिस्बेन येथे होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा केल्यानंतर भारताचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली. या 94 धावांच्या आघाडीसह कांगारुंनी दुसरा डाव 6 बाद 312 वर घोषित करत भारतासमोर चौथ्या दिवशी 407 धावांचे तगडे आव्हान ठेवले. दुसऱ्या डावात कॅमराॅन ग्रीनने 84, स्टीव्ह स्मिथने 81 आणि मार्नस लाबुशेनने 73 धावांची खेळी केली.
विजयासाठी 407 धावांचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्माच्या 52 आणि शुभगन गीलच्या 31 धावांच्या जोरावर चौथ्या दिवसअखेर 2 बाद 98 धावा केल्या. पाचव्या दिवशी विजयासाठी 309 धावांची गरज असताना पूजारा-रहाणे अनुभवी जोडी मैदानात होती. मात्र रहाणेला विशेष काही करता आले नाही. भारताची धावसंख्या 102 असताना रहाणे अवघ्या 4 धावांवर बाद झाला.
रहाणे बाद झाल्यानंतर रिषभ पंत मैदानात आला. त्याने पूजारा सोबत दमदार खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा वाढविला. पण भारताला विजयासाठी 157 धावांची गरज असताना रिषभ पंत 97 धावांवर बाद झाला. पंत आणि पूजारा यांनी चौथ्या विकेसाठी 148 धावांची भागिदारी केली. त्यानंतर लगेचच चेतेश्वर पुजारा 77 धावांवर माघारी परतला आणि भारताला पाचवा धक्का बसला.
पूजारा माघारी परतल्यानंतर भारतीय संघाला हा सामना वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. पराभव टाळण्यासाठी भारताला आणखी पडझड होऊ न देता उर्वरित षटकं खेळून काढायची होती आणि हे काम हनुमा विहारी आणि आर अश्विनने फत्ते केलं. हनुमा विहारी आणि आर अश्विनने सहाव्या विकेटसाठी 259 चेंडूत 62 धावांची भागीदारी रचत सामना अनिर्णित राखला.
भारताच्या दुसऱ्या डावात 131 षटकांत 5 बाद 334 धावसंख्या असताना आणि अखेरच्या दिवसाच्या खेळातील एक षटक बाकी असताना दोन्ही संघांची सामना संपवण्यावर सहमती झाली आणि सामना अनिर्णित राहिला.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 338/10(105.4); फलंदाजी : स्मिथ 131(226),लाबुशेन 91(196), विल पुकोव्हस्की 62(110);गोलंदाजी : रविंद्र जडेजा 62/4(18), नवदिप सैनी 65/2(13),जसप्रीत बुमराह 66/2(25.4),मोहम्मद सिराज 67/1(25).
भारत पहिला डाव : 244/10(100.4);फलंदाजी : पूजारा 50(176), गिल 50(101),पंत 36(67),जडेजा 28(37),रोहित 26(77); गोलंदाजी : कमिन्स 29/4(21.4),हेझलवूड 43/2(21.0),स्टार्क 61/1(19).
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : 312/6 घोषित. (87); फलंदाजी : ग्रीन 84(132),लाबूशेन 73(118), स्मिथ 81(167),पेन 39*(52); गोलंदाजी : सिराज 90/1(25),आश्विन 95/2(25),सैनी 54/2(16),बुमराह 68/1(21).
भारत दुसरा डाव : 334/5(131) ;फलंदाजी : विहारी 23*(161) आणि अश्विन 39*(128), पंत 97(118), पूजारा 77(105),रोहित 52(98), गिल 31(64), रहाणे 4(18); गोलंदाजी : हेझलवूड 2/39(26),कमिन्स 1/72(26),लायन 2/114(46).