नवी दिल्ली – येत्या काही दिवसात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. नागरिकांना आता आपल्या रोजच्या वापरातील वस्तू खरेदीसाठी जास्तीची रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे. तेल, साबन, दंतमंजनच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
दररोजच्या वापरातील वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे आपल्या उत्पादनाचा दर वाढवण्याचा विचार करत आहेत. यातील काही कंपन्यांनी तर याआधीच दर वाढवले आहेत. तर काही कंपन्या दर वाढवण्याच्या विचारात आहेत.
काही कंपन्यांनी याआधीच वाढवले दर –
दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या एफएसीजी मॅरिको आणि इतर काही कंपन्यांनी याआधीच दर वाढवले आहेत. डाबर, पारले, पतंजली या कंपन्यादेखील दरवाढीबाबत परिस्थितीचे बारकाईने निरिक्षण करत आहेत. नारळ तेल, इतर खाद्यतेल, पाम तेल यांसारख्या कच्च्या मालाच्या किमंती वाढल्यामुळे एफएमसीजी कंपन्यांनी दरवाढ केलीय.
पारले कंपनी दरवाढीच्या विचारात –
पारले प्राॅडक्ट्सचे वरिष्ठ प्रवर्ग प्रमुख मयंक शहा म्हणाले की, गेल्या तीन ते चार महिन्यांत आपण खाद्यतेलासारख्या वस्तूंमध्य़े लक्षणीय वाढ झाल्याचे पाहिले आहे. याचा परिणाम आमच्या मार्जिन आणि खर्चावर होत आहे. सध्यातरी आम्ही कोणतीही दरवाढ केली नाही. मात्र, कच्च्या मालाचे दर वाढत गेले तर आम्हाला देखील दर वाढवावे लागतील. 4 ते 5 टक्क्यांपर्यंत दरवाढ होईल असेही शहा यांनी सांगितले आहे.
डाबर इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी ललित मलिक म्हणाले की, अलिकडच्या काही महिन्यांत आवळा आणि सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. आगामी काळात काही प्रमुख वस्तूंमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे. शक्यतो कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ ही आम्ही स्वत:च सहन करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि काही वस्तूंमध्येच दरवाढ होईल, असे मलिक यांनी सांगितले.