मुंबई- औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलणारे क्षुद्र लोक आहेत. त्यातून काही साध्य होणार नाही, असे रोखठोक मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. औरंगाबादला पाणी द्या, तिथे चांगली झाडे लावा असेही त्यांनी सुनावले आहे. हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट झाली तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली असल्याची भीती नेमाडे यांनी व्यक्त केली.
भारतात लोकशाही धोक्यात आली असून सत्य बोलणाऱ्याला पोलीस संरक्षणात फिरावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
नेमाडे यांची सयाजी शिंदे आणि त्यांच्या सह्याद्री देवराई संस्थेमार्फत देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला करण्यात आली. या वेगवगेळ्या प्रकारच्या देशी बियाणांची रोपे तयार करून त्यांची राज्यातील वेगवगळ्या भागात लागवड करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने नेमाडे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी यावेळी “हिंदू’च्या पुढच्या भागात काय असेल?, खंडेरावचा प्रवास कसा असेल? इथपासून ते देशीवादाची आजची अवस्था, प्रमाण मराठी भाषा कशाला म्हणायचे?, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे नक्की काय होतेय?, शहरांच्या नावे बदलल्याने नक्की काय साध्य होतंय? ते आज भारतात लोकशाही धोक्यात आलीय का? इथपर्यंत वेवेगळ्या विषयांवर सडेतोड मते मांडली.
देशीवाद धोक्यात
नेमाडे यांनी मुलाखतीत म्हटले की, देशीवाद हा जगभरात स्वीकारला गेला आहे. “एन्सायक्लोपीडिया’मध्ये देशीवाद हा शब्द आणि संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. ज्या मातीतून आपण उगवलो त्या मातीशी कृतज्ञ राहणे म्हणजे देशीवाद आहे. हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट झाली तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली आहे. झापडबंद पद्धतीने बदल स्वीकारले गेल्याने हे झाले असल्याची टीकाही त्यांनी केली. जगभरात उजव्या विचारसरणी वाढीस लागल्याने देशीवाद धोक्यात आला आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भारतातील कम्युनिस्टांनी जात वास्तव नाकारले. त्याच्या परिणामी ते संपले असल्याची टीका नेमाडे यांनी केली.
प्रमाण भाषा असे काही नाही
प्रमाण मराठी भाषा असे काही नाही. प्रत्येकाची भाषा तेवढीच प्रमाण आणि शुद्ध आहे असेही त्यांनी स्पष्ट म्हटले. इंग्रजांनी मराठी भाषेचा कोष करण्याचे काम चित्पावन ब्राम्हणांना दिले होते. त्यामुळेच ती प्रमाण भाषा पुण्यात मानली गेली. परंतु प्रत्येकाची भाषा तेवढीच प्रमाण आहे. इंग्रजी शाळांमधून शिकणारी मुले पुढे काही बनू शकत नाहीत. त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. तसेच राष्ट्र आणि धर्म या संकल्पना नष्ट झाल्या पाहिजेत असे कठोर मतही त्यांनी व्यक्त केले.