औरंगाबाद – आईवडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली असल्याने नैराश्यातुन तरूणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी घडली आहे. वैशाली राधाकिसन जाधव (वय-20, रा. लाडगाव, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी वैशालीने एक चिठ्ठी लिहिलेली आहे. त्यानुसार तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. त्यात त्यांनी तिच्या अगोदर चार मुलींचे लग्न केलेले आहे. तिचे देखील चांगले लग्न करण्याचे आईविडलांचे स्वप्न होते. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली असल्याने या नैराश्यातुन तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असे त्या चिठ्ठीत लिहिलेले आहे.
वैशालीने आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कोणालाही जबाबदार धरलेले नाही. वैशालीच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास करमाड पोलीस करत आहेत.