जम्मू – दिनांक 5 ऑगस्ट 2019 हा जम्मू-काश्मीर आणि संविधानासाठी काळा दिवस होता. भाजप आमच्या पक्षाला घाबरत आहे. कलम 370 रद्द करण्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 5 ऑगस्ट रोजी आमचे नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते, हे यावरून स्पष्ट होते आहे. इतर कोणत्याही पक्षावर अशी बंदी घालण्यात आलेली नव्हती, असे प्रतिपादन पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. भाजपा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राज्यात धार्मिक विद्वेष पसरवत आहे, असा आरोपही मुफ्ती यांनी केला आहे.
जम्मू शहरातील गांधीनगर येथील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करताना मेहबुबा यांनी जम्मू प्रदेशाला भाजपने काय दिले, असा प्रश्न उपस्थित केला. काश्मीरमध्ये येणारे दोन कोटी पर्यटक, खोऱ्यातील तरुणांच्या हातात दगडांऐवजी लॅपटॉप आणि कॉम्प्युटर, श्रीनगरमध्ये जी-20 यशस्वी झाल्याबद्दल ते बोलत आहेत. पण मते मिळविण्यासाठी त्यांना जातीय आधारावर भडकावले जात आहे. खोऱ्यात येणारे पर्यटक कोण आहेत माहीत नाही; पण लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. जम्मूमध्येही जी-20 आयोजित करायला हवे होते, पण भाजपने तसे केले नाही.