श्रीनिवास शारंगपाणी
नवरात्रीच्या काळात आपण स्त्री-शक्तीचं दुर्गेच्या रूपात पूजन करतो; पण प्रत्यक्षात समोर घडत असलेल्या घटना लक्षात घेतल्या तर कथनी एक आणि करणी दुसरीच असंच दिसतं. वास्तवात आपण स्त्री-शक्तीला ओळखलंच नाही असं म्हणावं लागेल. सणावारी देवीची पूजा करायची आणि समाजात तिची निर्भत्सना आणि विटंबना करायची अशा प्रकारचा खेळ पुरुषवर्ग खेळतोय.
कोणत्याही सामान्य माणसाला व्यथित करणाऱ्या घटना सभोवती एकापाठोपाठ एक अशा घडत आहेत आणि ही शृंखला थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. मुलींना एकटं गाठून सामूहिक बलात्कार करून अतिशय पाशवी रीतीनं वार करून त्यांना मारण्यात समाजातील नराधम कोणता पुरुषार्थ मानतात हेच कळत नाही. स्त्रीच्या ताकदीची त्यांना कल्पना नसावी म्हणूनच तिला एकटी गाठून अत्याचार करण्याचा ते असला भ्याड मार्ग निवडतात. स्त्री ही अबला आहे असं ते समजत असतील, तर ती त्यांची घोडचूक आहे. एकंदरीतच स्त्री म्हणजे नक्की काय हे त्या दुष्प्रवृत्तींनाच काय पण समाजालाही नीटसं कळलेलं नाही असं वाटू लागतं.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:।।
हे वचन आपण ऐकत आलो आहोत. गेल्या दीड शतकात अनेक थोर व्यक्तींनी समाज-सुधारणा करून स्त्रियांची वैयक्तिक आणि सामाजिक पातळी उंचावण्याचा प्रयत्न केला आहे, हेही आपण पाहत/वाचत आलो आहोत. म्हणजे आपल्या संस्कृतीत स्त्रियांचं स्थान अतिशय वरच्या दर्जाचं आहे. परंतु मधल्या काळात या सांस्कृतिक मूल्यांची घसरण झाली आणि स्त्रियांचं कुटुंबातील आणि समाजातील स्थान इतकं खाली गेलं की काही ठिकाणी आणि काही बाबतीत त्यांना सामान्य मानवी हक्कांपासून बराच काळ वंचित राहावं लागलं. दुर्दैवानं आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. कागदावर आणि काही अंशी विचारात स्त्रियांचं स्थान उंचावलेलं असलं तरी वास्तव हे खूप वेदनाकारक आहे, हे रोज घडणाऱ्या स्त्रियांवरच्या अत्याचारांवरून लक्षात येईल.
मग विचारात आणि वास्तवात एवढी फारकत आणि विषमता का असावी? समाजातील स्त्रीविषयक संवेदना-विशेषत: पुरुषांची आणि काही अंशी स्त्रियांची सुद्धा याला कारणीभूत आहे. तू मुलगी आहेस, तुला असं वागणं शोभत नाही, ही पुरुषांची कामं आहेत- हे ताकदीचं काम आहे, तुला झेपायचं नाही अशा प्रकारचे संवाद आपण नेहमी ऐकत आलो आहोत. म्हणजे स्त्रीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत मानण्याची घोडचूक लोक नेहमी करीत असतात.पण वास्तव काय आहे? निसर्गही या बाबतीत काय व्यक्त करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसंच या बाबतीत झालेल्या संशोधनाचाही मागोवा घ्यावा लागेल.
1973 साली टेनिसचा एक विलक्षण सामना झाला. एके काळचा अमेरिकन टेनिस चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीतला पहिल्या क्रमांकाचा पुरुष खेळाडू बॉबी रिग्ज आणि अमेरिकेचीच 39 ग्रॅंड-स्लॅम विजेती स्त्री टेनिस खेळाडू बिली जीन किंग यांच्यातला तो सामना होता. रिग्ज तेव्हा जवळ जवळ 55 वर्षांचा होता पण किंगदेखील 39 वर्षांची म्हणजे क्रीडाजगतात प्रौढच समजली जात होती. हा सामना किंगनं 6-4, 6-3, 6-3 असा सरळ जिंकला. महत्त्वाची बाब अशी की रिग्जनं स्त्री खेळाडूंना आव्हान दिलं होतं आणि किंगनं ते स्वीकारून लीलया सामना जिंकून दाखवला होता. त्या क्षणापासून आधुनिक जगामध्ये स्त्री-शक्तीची जाणीव झाली असं म्हणायला हरकत नाही.
अगदी आपल्याकडेही पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश इथं अनेकदा स्त्री-मल्ल विरुद्ध पुरुष मल्ल अशा कुस्त्यांची दंगल घडवून आणली जाते आणि अनेकदा त्यात पुरुष पहिलवानांना मार खावा लागतो. दिव्या सैनी नावाच्या अशाच एका स्त्री पहिलवानानं अनेक पुरुष पहिलवानांना धूळ चारली आहे. आज संशोधनानं हे सिद्ध झालं आहे की केवळ ताकदीच्या बाबतीत पुरुष एखादेवेळी सरस असू शकेल पण क्षमता किंवा ज्याला आपण स्टॅमिना म्हणतो त्यामध्ये स्त्रिया खचितच पुरुषांपेक्षा सरस आहेत. त्यांची आयुर्मर्यादाही पुरुषांपेक्षा लक्षणीय रीतीनं जास्त आहे. याचं कारण अगदी सरळ आहे. संपूर्ण आयुष्यात स्त्रियांना ज्या शारीरिक आणि मानसिक आव्हानांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे त्या कणखर बनत जातात.
निसर्गाकडे आपण पाहिलं तर अक्षरश: अचंबित व्हायला होतं. बहुसंख्य प्राण्यांमध्ये मादी अधिक ताकदवान आहे असं आढळून येतं. सिंहिण पिलांना जन्म देऊन त्यांचं संगोपन तर करतेच पण शिकार करून पूर्ण कुटुंबाला खाऊही घालते. मधमाशांची गंमत तर औरच आहे. राणी माशी पोळ्याची प्रमुख असते व नर माश्यांना केवळ पुनरुत्पादनासाठीच पोळ्यात आश्रय दिला जातो. त्यांचं काम झालं की त्यांना तात्काळ मरण पत्करावं लागतं. एवढंच नव्हे तर बऱ्याचदा त्यांना भीक मागून राहावं लागतं. ते पोळ्याला भार होत असले तर त्यांना चक्क हाकलून देण्यात येतं. पैशांसाठी वा इतर कारणांनी पत्नीला हाकलून देणाऱ्या समस्त नवऱ्यांनी यापासून बोध घ्यावा. उद्या महिला अधिक संघटित आणि सक्षम झाल्या तर खेळी उलटू शकते!
निसर्गात लैंगिक द्विरूपता म्हणजेच नर आणि मादी यांच्यामधील लिंगभेदाव्यतिरिक्त मोठा भेद असणे-अशी परिस्थिती अनेक वेळा आढळून येते. यामुळेच नर आणि मादी यांच्यात आकार, ताकद आणि आक्रमक आचरण अशा बाबतीत अनेक प्रजातींत मादी नरापेक्षा खूपच वरचढ असते असं दिसून येतं. कोळी प्राण्याखेरीज अशी द्विरूपता आढळत नाही. परंतु सरीसृप प्राणी, मत्स्यवर्ग, घुबडे याशिवाय ठिपकेदार तरस, नील देवमासा असे काही सस्तन प्राणी अशी द्विरूपता दाखवतात. त्यांच्यात मादी ही नरापेक्षा आकारानं आणि ताकदीनं खूप मोठी असते. निसर्गानं ही योजना त्या प्रजातींच्या पुनरुत्पादनाची चोख व्यवस्था व्हावी या दृष्टीनं केलेली दिसते. अँगलर फिश या माशाची मादी तर एवढी मोठी असते की अगदी छोटा नर मादीच्या अंगामध्ये आपले दात रुतवून आयुष्यभर तिचं शोषण करून परजीवी होऊन राहतो-इतकं की मादीला याचा पत्ताही नसतो!
म्हणजेच निसर्गानं कोणत्याही प्रकारे स्त्री-जातीला खालच्या पातळीवर ठेवलेलं नाही. खरं तर बऱ्याच वेळा तिला नरापेक्षा अनेक पटीनं सामर्थ्यवान बनवलेलं आहे. आपण मानवजातीनं मात्र हजारो वर्षं स्त्रीला घरात डांबून तिला दुर्बल बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आज तिला तिच्या हक्कांची जाणीव झालेली आहे आणि तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला ती सतत वाचा फोडत आहे.
पण तरीही ते खूप अपुरं आहे. अजूनही त्यांच्या स्वच्छतागृहं, आरोग्य-साधनं अशा मूलभूत गरजांकडे समाज आणि देश दुर्लक्ष करीत आहे. त्यातूनच राइट टु पी यांसारख्या चळवळी निर्माण झाल्या आहेत. परंतु माझ्या मते स्त्रियांमध्ये सक्षम नेतृत्व आल्याशिवाय आणि आपल्या शक्तीचं वास्तव ठळकपणे समोर आणल्याशिवाय पुरुषप्रधान व्यवस्थेला जबरदस्त धक्का पोचणार नाही.