मुंबई – खडसे यांची ज्या प्रकरणात चौकशी केली आहे, त्यात अद्याप काहीही तथ्य आढळलेले नाही. त्यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसून व्यवहार कायदेशीररीत्या झाले आहेत. यापूर्वी कोणत्याही चौकशी समितीला त्यात काही आढळले नाही. पण या एजन्सी कुभांड रचून त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने भोसरी येथील जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी बोलावल असून त्यांची चौकशी केली जात आहे. मात्र, हे सगळ ईडीचे कुभांड असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, भाजपाचा एकनाथ खडसेंवरचा राग फार जुना आहे. त्यांना त्यांच्या पक्षातही फार वाढू दिले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्याचे काम त्या पक्षाने केले. आम्ही त्यांना सन्मानाने पक्षात प्रवेश दिला. आज त्यांनी चिडून जाऊन एकनाथ खडसेंना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याचे काम केले आहे. मुद्दाम हे सर्व केले जात आहे. एकनाथ खडसे लवकरच या सगळ्यातून बाहेर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सहकारी बॅंकांची स्वायत्तता धोक्यात
गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार यात फारसा फरक नाही. अमित शहा यांच्या नेमणुकीमुळे देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल. मी त्यांच्या नेमणुकीचे स्वागतच करतो. पण, त्याचसोबत रिझर्व्ह बॅंक नागरी सहकारी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांवर बंधन घालत असल्याने त्यांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. त्यांना अमित शहा सोडवतील, असा आम्हाला विश्वास आहे. देशातल्या बॅंकिंग व्यवसायावर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले.