प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 21 -लोकाभिमुख प्रशासनाचे कर्तव्य मानणारे युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. चारित्र्य, समर्पण आणि उत्तरदायित्वाच्या भावनेने प्रशासनात युवक आले, तर देशाचे चित्र बदलेल, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले आहे.
पंडित नेहरू सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात धर्माधिकारी यांच्या हस्ते बावीस वर्षांच्या लष्कराच्या सेवेनंतर पहिल्याच प्रयत्नात “आयएएस’ उत्तीर्ण होणाऱ्या लेफ्टनंट कर्नल अमोल आवटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस, मिलिंद कुलकर्णी, मकरंद केळकर, राजेंद्र आवटे, डॉ. शीतल आवटे, गणेश जाधव, मकरंद केळकर, अजय आवटे, सचिन पाटील, प्रा. राम डिंबळे, अपर्णा आवटे आदी उपस्थित होते.
वडीलांच्या नोकरीमुळे राज्यभर अनेक ठिकाणी शिक्षण पूर्ण केले. “एनसीसी’मधील तीन वर्षांनी प्रेरणा दिली. तिथे रिपब्लिकन डे च्या परेडसाठी मी निवडलो गेलो होतो. बेस्ट कॅंडीडेट म्हणून निवड झाली होती. त्या प्रेरणेतून सैन्यात दाखल झालो. राष्ट्रीय रायफल्समध्ये प्रशिक्षण झाले.
राजस्थान, पंजाब, काश्मीर येथे सैन्य दलातील कारवाया तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून कांगो येथे शांती सेनेतील कार्यात सहभाग घेतला. अतिरेकी कारवायांवर नियंत्रण मिळविताना पायाला गंभीर दुखापत झाली. आंतरराष्ट्रीय संयुक्त सैन्य कारवाईत काम करणे ही शिकण्याची मोठी संधी असते, असे आवटे यांनी सांगितले.
विविध विद्याशाखांत शिकणाऱ्या युवकांना सैन्याच्या माध्यमातून देश सेवेची चांगली संधी आहे. माजी सैनिकांसाठी काम करणे हे ही सामाजिक काम होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सैन्यातील अनुभवाचा उपयोग
देशसेवा सैन्यात केल्याने जो अनुभव मिळाला, त्याचा उपयोग प्रशासकीय सेवेत होणार आहे. सैन्यात प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करावे लागते. अभ्यास करावा लागतो. जिद्द, परिश्रमाची तयारी लागते. प्रशासकीय सेवेत “टीम वर्क’ला भर देणार आहे. आयएएस हेच ध्येय ठेवून अभ्यास करुन यश मिळविल्याचेही आवटे यांनी सांगितले.