आगरतळा – त्रिपुरातील भाजपचे आमदार अरुणचंद्र भौमिक यांनी तृणमूल कार्यकर्ते आणि नेत्यांवर तालिबानच्या शैलीत हल्ले करून त्यांना येथून हाकलून द्यावे, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे. त्यांच्या या विधानांमुळे मोठेच वादंग निर्माण झाले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मात्र त्यांच्या या विधानापासून फारकत घेतली आहे. हे त्या आमदाराचे व्यक्तिगत मत आहे त्याच्याशी भाजप पक्षाचा काहीएक संबंध नाही, असे पक्षाने म्हटले आहे.
भौमिक यांनी पक्षाच्या वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा केव्हा तृणमूलचे हे लोक त्रिपुराच्या विमानतळावर येतील तेव्हा त्यांच्यावर तालिबानी पद्धतीने हल्ले करा. तृणमूलच्या आक्रमणापासून आपल्याला आपले सरकार वाचवायचे आहे, असेही भौमिक यांनी म्हटले आहे.
त्रिपुरात गेली 25 वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते. ते सरकार पाडून भाजपचे सरकार राज्यात प्रथमच सत्तेवर आले आहे. त्या राज्यात 2023 साली निवडणुका व्हायच्या आहेत. त्यासाठी पक्षबांधणी करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी गेल्या काही काळात त्रिपुरात सतत भेटी दिल्या आहेत.
त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचे प्रकारही या आधी घडले आहेत. आता पुन्हा एकदा भाजप आमदाराने ही जाहीर चिथावणी दिल्याने त्रिपुरात राजकीय वादंग निर्माण झाले आहे.