कोलकाता (पश्चिम बंगाल) – पश्चिम बंगालमध्ये २४ परगणा जिल्ह्यात कारवाईसाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. तथापि ईडीनेच प्रक्षोभ निर्माण केल्यामुळे हा प्रकार घडला आहे असा दावा तृणमूल काँग्रेस नेते कुणाल घोष यांनी केला आहे.
कुणाल घोष यांनी आरोप केला की ईडी सारख्या केंद्रीय एजन्सी भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर तृणमुल कॉंग्रेस नेत्यांविरोधात काम करत आहेत. सततच्या या कारवांयामुळे जनताच भडकली असून त्यातून त्यांनी हे हल्ले केले आहेत.
भाजपच्या सूचनेनुसार केंद्रीय एजन्सी आणि त्यांच्या फौजा टीएमसीच्या सतत एकदुसऱ्या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्रास देत आहेत, नकारात्मक वक्तव्ये पसरवत आहेत असे घोष म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, भाजपचे पश्चिम बंगालचे प्रमुख सुवेंदू अधिकारी, ज्यांना एकेकाळी भाजपनेच ‘चोर’ म्हणून संबोधले होते, त्यांच्या निवासस्थानावर मात्र ईडीने कधीच छापा टाकला नाही.
गुरुवारी रात्री पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील संदेशखळी गावात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर हल्ला करण्यात आला त्यात ईडीच्या वाहनांचे नुकसान झाले.
तृणमुल कॉंग्रेस नेत्यांवर छापा टाकत असताना तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी तेथे निदर्शने सुरू केली.नंतर जमावाने ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली, असे ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत एजन्सीचे दोन अधिकारी जखमी झाले आहेत.