पुणे – महाराष्ट्रासह राज्यातील एकूण 7 राज्यांमध्ये अटल भूजल योजना राबविली जाणार आहे. त्याकरिता 6 हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाना, कर्नाटक, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांची या योजनेकरिता निवड झाली आहे. या योजनेचा सदर राज्यांमधील 78 जिल्ह्यांमधील 8 हजार 350 ग्रामपंचायतींना याचा फायदा होणार आहे.
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यांतर्गत शेतीला पूरक दूग्धव्यवसाय, पशुपालन, फळबाग लागवड यासारख्या योजना राबविल्या जातात. दिवसेंदिवस या कल्याणकारी योजनांच्या संख्येत वाढ होत आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पाणी हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा योग्यप्रकारे पुरेपुर वापर व्हावा, याकरिता भूजल व्यवस्थापनात लोकसहभाग वाढविणे, व्यापक स्वरुपात काटेकोटरपणे पाणी वापरास प्रोत्साहन देणे, पीकपद्धतींचा विकास करणे, सामाजिक पातळीवर पाण्याचा समान वापर करण्यासाठी नागरिकांच्या भूमिकेत बदल करणे, हा या योजनेमागील उद्देश आहे.
या योजनेकरिता 6 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यापैकी 50 टक्के निधी केंद्र सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देणार आहे, तर उर्वरित 50 टक्के निधीसाठी जागतिक बॅंकेकडून कर्ज घेतले जाणार आहे. कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या राज्यांकरिता ही योजना पूरक ठरणार आहे. त्यामुळे या योजनेकरिता 7 राज्यांची निवड करण्यात आली आहे.