नवी दिल्ली – मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीवरील शेतकऱ्यांच्या मोर्चाने आणखी तीव्र स्वरूप धारण केले आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे परत घेतले नाही, तर येत्या 8 तारखेला संपूर्ण भारत बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.
भारत बंद वेळी मात्र काही बाबींना सूट देण्यात आली असल्याचे शेतकरी नेता बलदेव सिंह यांनी सांगितले. यात प्रामुख्याने ऍम्बुलन्स आणि लग्न समारंभाला सूट देण्यात आली आहे.
दि. 8 डिसेंबर, मंगळवार रोजी संपूर्ण भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण बंद राहणार, तर 3 वाजता चक्काजाम करण्यात येणार आहे. मात्र ऍम्बुलन्स आणि लग्नासाठी रस्ते खुले राहणार असल्याचे शेतकरी नेते बलदेव सिंह यांनी सांगितले.
हा बंद शांतिपूर्ण मार्गाने करण्याचे आवाहनही शेतकऱ्यांकडून करण्यात आले आहे. आंदोलनाला कुठेही गालबोट लागू देऊ नये असेही बलदेव सिंह यांनी यावेळी म्हटले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांबरोबर केलेल्या आजवरच्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. केंद्र सरकार 9 डिसेंबरला शेतकऱ्यांबरोबर पुन्हा एकदा चर्चा करणार आहे.