वडगाव मावळ – “लॉकडाऊन’च्या संकटात वऱ्हाडी मंडळींची गर्दी टाळण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक विवाह समारंभ पुढे ढकलण्यात आले आहेत. तर सामूहिक विवाह सोहळे यंदा रद्द करण्यात आले आहेत. लॉकडाऊनचे गांभीर्य लक्षात घेत मावळ तालुक्यातील एक विवाह चक्क पहाटेच्या मुहूर्तावर व तोही घरातच झाला. या वेळी ना वऱ्हाडींची गर्दी, ना जेवणाच्या पंगती, ना नवरदेवाची मिरवणूक निघाली. त्यामुळे या पहाटेच्या लग्नाची मावळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
करोनाच्या संकटामुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाली. यामध्ये प्रामुख्याने ज्यांचे विवाह ठरले, मुहूर्त काढले ते अडचणीत सापडले. संचारबंदीमुळे थाटामाटात लग्नास परवानगी मिळेना. मंदिरात विवाह अटोपत गावकऱ्यांची गर्दी होण्याची भीती. करोनाची दहशत आणि पोलिसांची धास्ती वेगळीच. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी घरात विवाह समारंभ उरकून घेतले.