मुंबई – मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याला अलोट गर्दी लोटली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना व महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करीत आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेना प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांना निवडणुकांनंतर अडीज अडीज वर्ष मुख्यमंत्रीपदाचा साक्षात्कार झाल्याचं म्हणत राज ठाकरेंनी टीकेची झोड उठवली.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी राज्यात आले असताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री भाजपचा होणार असं स्पष्ट केलं होत. मात्र उद्धव ठाकरे हे त्यावेळी काहीही बोलले नाहीत. मात्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपण सरकार अडवू शकतो हे समजलं व त्यांनी अडीज अडीज वर्ष मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुढे आणला.’ अशी टीका केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करताच एकच हाशा पिकला. अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत उपहासात्मक टिप्पणी करताना, लग्नाला वेगळीच जोडी दिसली असं म्हंटल.