पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेशात कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्यास सातत्याने नकार देणाऱ्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (बसप) पंजाबात पुन्हा एकदा शिरोमणी अकाली दलासोबत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर अनेकांना मागील लोकसभा निवडणुकीवेळी मायावतींनी समाजवादी पक्षाशी दुसऱ्यांदा केलेल्या आघाडीची आठवण झाली.
2014 मध्ये बसपला शून्य जागा मिळाल्या होत्या. मात्र, ही आघाडी केल्यानंतर बसपला फायदा झाला, तर समाजवादी पक्षाला पाच जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर पहिली संधी मिळताच बसपने ही आघाडी तोडली होती आणि तेव्हापासूनच अशा प्रकारच्या आघाडीमुळे बसपचा काहीही फायदा होत नाही, असा तर्क सांगून हा पक्ष कोणत्याही नव्या आघाडीला नकार देत होता. आपल्याला मिळणारी मते आपण मित्रपक्षांकडे हस्तांतरित करू शकतो; परंतु कोणताही मित्रपक्ष त्याला मिळणारी मते आपल्याला हस्तांतरित करू शकत नाही, असे बसपचे म्हणणे आहे; परंतु सध्याचे वास्तव असे आहे की, बसपची मुख्य आधारभूमी असलेल्या उत्तर प्रदेशातच पक्षाला उतरती कळा लागली आहे.
सर्वांत मोठ्या अशा या राज्यात 2007 मध्ये पूर्ण बहुमतानिशी सत्तेवर आल्यानंतर “यूपी हुई हमारी है, अब दिल्ली की बारी है’ अशी आरोळी पक्षाने ठोकली होती; परंतु 2012 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सरकारविरोधी लाटेने पक्षाला सत्तेतून बाहेर ढकलले. पक्षाची सर्व स्वप्ने धुळीला मिळाली. ज्यावेळी “कांशीराम की नेक कमाई, मायावती ने बेच खाई’ अशी दूषणे जेव्हा पक्षाला दिली जात असत, त्यावेळीही पक्षाने आपले स्वप्न गमावले नव्हते, असे काही जाणकार सांगतात. परंतु मागील शतकाच्या अखेरच्या दशकात त्यांनी रूढ केलेला “पलटीमार सिद्धांत’ अंमलात आणून राजकारण करता करता पक्षाची वाटचाल इतकी संदिग्ध होत चालली आहे की, ज्या बहुजनांच्या हितासाठी “पलटीमार सिद्धांत’ पक्षाने रुजवला त्यांनाही आता समजेनासे झाले आहे की, कोणत्या वेळी कोणत्या पक्षाशी आघाडी केली जाईल आणि कोणत्या पक्षाशी आघाडी कधी तोडली जाईल. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या कधी कोणत्या नेत्यावर नाराज होऊन त्याला पक्षातून काढून टाकतील, याचाही अंदाज कुणाला येईनासा झाला आहे. पंजाबात बसपने अकाली दलाशी आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर प्रसिद्ध व्यंगचित्रकार इरफान यांनी एक चित्र काढले. त्यात मायावती सुखबीरसिंह बादल यांना असे म्हणताना दर्शविले आहे की, “आमचा हत्ती कदाचित आता तुम्हाला उपयोगी पडेल.
उत्तर प्रदेशात तर तो नुसताच साखळीत बांधलेला असतो.’ हत्ती हे बसपचे निवडणूक चिन्ह असून, कधी-कधी राजकीय वाटचाल बदलताना मायावतींनी हत्तीला ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गणेशाचीही उपमा दिली होती, हे येथे उल्लेखनीय आहे. हा हत्ती उत्तर प्रदेशात बांधलेल्या अवस्थेत असल्यामुळेच मायावतींनी पंजाबातील आघाडीत “ज्युनियर पार्टनर’ बनण्यास अनुमती दिली हे उघड आहे. विधानसभेच्या 117 जागांपैकी अवघ्या वीस जागांवर बसप नशीब आजमावणार आहे. उत्तर प्रदेशातील 23 ते 24 टक्के दलित लोकसंख्येच्या तुलनेत पंजाबात दलितांची लोकसंख्या 32 टक्के आहे आणि ती कांशीराम यांची जन्मभूमीही आहे.
दलित की बेटी किंवा दलितांच्या सर्वांत प्रभावी नेत्या ही प्रतिमा जर मायावतींनी जपली असती, तर अशा प्रकारची आघाडी त्यांनी निश्चितच केली नसती. परंतु पराभूत व्यक्तींकडे पर्याय अत्यंत मर्यादित असतात. पंजाबातील दलित मतदार आपला एकमेव आधार म्हणून बसपकडे पाहात नाहीत, हे मायावतींना माहीत आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष पंजाबात आतापर्यंत दोनच निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करू शकला आहे. 1992 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने नऊ जागा जिंकल्या होत्या आणि 1996 मध्ये अकाली दलाबरोबर आघाडी बनवून लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून पक्ष राज्यातील दलित मतदारांचा विश्वास संपादन करण्याची खटपट करीत आहे. अशा स्थितीत बसप आपल्या कोणत्या मतांचे हस्तांतरण करून अकाली दलाला विजय मिळवून देईल, हाच प्रश्न आहे.
विशेषतः भाजपची ताकद अकाली दलाच्या सहयोगाशिवाय राज्यात फारशी नसली तरी भाजपने आता दलित मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. अकाली दलाने दलित उपमुख्यमंत्री करण्याचा वायदा केला असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून तसाच वायदा कॉंग्रेसनेही केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुद्द्यावरून भाजपपासून विलग झाल्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्याव्यतिरिक्त शिरोमणी अकाली दलालाही बसपकडून फारशा अपेक्षा नसाव्यात; परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की, या आघाडीच्या टिकाऊपणाबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून विलग होणार नाहीत, याची खात्री दोन्ही पक्षांना आपापल्या मतदारांना द्यावी लागत आहे. हरियाणातील अनुभव फारसा जुना नसल्यामुळे हा विश्वास जनतेला देणेही अवघड आहे.
फॅशन शोमध्ये ज्याप्रमाणे मॉडेल कपडे बदलत राहतात, त्याच वेगात हरियाणामध्ये पक्षाने आपले सहकारी पक्ष बदलले होते. पंजाबचे राजकीय हवामान उत्तर प्रदेशपेक्षा खूपच वेगळे आहे. तिथे सत्तारूढ कॉंग्रेसअंतर्गत कलहांनी खूपच पोखरलेली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आणि भाजपने अद्याप निवडणूकविषयक धोरण ठरविलेले नाही. अशा वेळी राज्याची सत्ता अनेकदा सांभाळणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने आघाडीची घोषणा करून या पक्षांना मागे टाकले आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार शिरोमणी अकाली दलाने भाजपची आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडल्यानंतर राज्यात चौकोनी मुकाबला होण्याची शक्यता वर्तविली जात होती. या नव्या आघाडीच्या घोषणेमुळे आता हा मुकाबला त्रिकोणी होऊ शकतो. भाजपचे अस्तित्व काही जिल्ह्यांपुरतेच मर्यादित होऊ शकते. म्हणजेच निवडणुकीचे निकाल अनपेक्षित असू शकतात.
पंजाबात सामान्यतः प्रत्येक निवडणुकीनंतर सत्तांतर होते. अकाली-भाजप आघाडीने 2012 मध्ये हा पायंडा मोडून दुसऱ्यांदा सत्ता हस्तगत केली होती; परंतु मागील निवडणुकीत ही आघाडी स्वतःला सरकारविरोधी लाटेपासून वाचवू शकली नाही. यावेळी मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांच्याविरुद्धच मोठ्या प्रमाणावर असंतोष स्पष्ट दिसून येत असताना कॉंग्रेस स्वतःचा बचाव करू शकेल का, हा मुख्य प्रश्न आहे. काही जाणकारांचे म्हणणे असे आहे की, निवडणुकीत जर थेट मुकाबला झाला म्हणजेच तो कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांच्यापुरताच मर्यादित राहिला आणि त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता संपुष्टात आली, तर मायावती यांना निकालापूर्वीच निराश व्हावे लागेल. कारण त्यांना “किंग’ किंवा “किंगमेकर’ बनण्यात जेवढा आनंद मिळतो, तेवढा अन्य कोणत्याही गोष्टीत मिळत नाही.