नगर – नगर शहरातील कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा वेशीला टांगण्यात आल्याचा प्रत्यय आज आला. एकापाठोपाठ एक असे दोन खून झाल्यानंतर सोमवारी दुपारी चाणक्य चौकात किरकोळ कारणावरून सहा ते सात जणांनी चाकूने मारहाण करून कॉंग्रेस पदाधिकाऱ्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणामुळे पुन्हा एका नगर शहर हदरले आहे.
विशेष म्हणजे ही मारहाण सुरू असतांना रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मारहाण झाल्यानंतर जखमीला लोकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत कोतवाली पोलिसांनी सहा हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील हत्यारे व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर उद्या नगर शहरात येणार असतांना ते येण्याच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा हल्ला होण्याचा प्रकार घडला आहे. नगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न नगरकरांना पडला आहे. चोऱ्या, हल्ले वाढले आहेत. रस्त्याने जातांना कट मारला म्हणून सहा जणांनी या युवकाला मारहाण केली. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कॉंग्रेसचे पदाधिकारी विलास उबाळे यांच्या मुलाला चाकूने मारहाण झाली असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळताच ते घटनास्थळी फौजफाटासह दाखल झाले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत घटनेतील सहा आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.