Asia Cup 2023 Super-4 India vs Pakistan :आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला आहे. पावसाने व्यत्यय आणलेला सामना दोन दिवसांत संपला. रविवारी (10 सप्टेंबर) सामना सुरू झाला, मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. खेळ थांबला तोपर्यंत भारताने 24.1 षटकात 147 धावा केल्या होत्या.
सोमवार(दि.11) हा सामन्याचा राखीव दिवस होता. पुढे खेळताना भारतीय संघाने 50 षटकात 2 बाद 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला 32 षटकांत आठ गडी गमावून केवळ 128 धावाच करता आल्या. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. अशा प्रकारे टीम इंडियाने 228 धावांनी विजय मिळवला.
भारतीय संघाने पाकिस्तानवर 228 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2008 च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या मीरपूरमध्ये 140 धावांनी त्यांचा पराभव केला होता.
पाकचे फलंदाज ठरले अपयशी..
पाकिस्तानचे फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले.भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. संघाचे केवळ चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. फखर जमानने सर्वाधिक 27 धावा केल्या. इफ्तिखार अहमद आणि आगा सलमानने 23-23 धावा केल्या. कर्णधार बाबर आझम 10 धावा करून बाद झाला. या चौघांशिवाय एकाही फलंदाजाला 10 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. इमाम उल हक केवळ नऊ, शादाब खान सहा, फहीम अश्रफ चार आणि मोहम्मद रिझवान केवळ दोन धावा करू शकले. शाहीन आफ्रिदी सात धावा करून नाबाद राहिला.
कुलदीपचा पंच…
पाकिस्तानचे फलंदाज कुलदीप यादवचे चेंडू समजू शकले नाहीत. कुलदीपने अप्रतिम गोलंदाजी करत आठ षटकांत 25 धावा देत पाच बळी घेतले. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
तत्पूर्वी, सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी 2 बाद 356 असा धावांचा डोंगर उभा केला. चार महिन्यांनंतर संघात पुनरागमन केलेल्या लोकेश राहुलसह स्टार फलंदाज विराट कोहलीनेही नाबाद शतकी खेळी केली. या सामन्यात रविवारी पावसाने खोडा घातल्याने उर्वरित सामना सोमवारी खेळवण्यात आला. रविवारी कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली होती व मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आणि कोहली व राहुल यांनी त्यावर कळस चढवला.
रविवारच्या 2 बाद 147 धावांवरून पुढे खेळ सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एकदा पावसाने खेळ केला. त्यामुळे सामना उशिरा सुरु झाला. मात्र, कोहली व राहुल यांनी पहिल्यापासूनच पाकिस्तानच्या गोलंदाजांना डोईजड होऊ दिले नाही व अफलातून फटकेबाजी केली. या जोडीने संघाचे दीडशतक पार केले. त्यानंतर राहुलने धावांचा वेग वाढवला. दरम्यान या जोडीने आपापली अर्धशतकेही पूर्ण केली. त्यानंतचर संघाचे द्विशतकही साकार केले. यावेळी कोहलीला तब्बल तीन जीवदाने मिळाली. त्याचा पुरेपूर लाभ घेत त्याने टोलेबाजी केली.
राहुलने अचामक गिअर बदलला व हल्ला चढवला त्यामुळे पाकिस्तानचे गोलंदाज बॅकफुटवर गेले. कोहलीने राहुलसह संघाचे त्रिशतकही फलकावर लावले. हे दोघे शतकाच्या जवळ आलेले असतानाही त्यांनी धोका पत्करुन फटकेबाजी केली व आपापली शतकेही पूर्ण केली. त्यांनी अखेरच्या पाच षटकात चौकार व षटकारांची बरसात करत संघाला साडेतीनशेपेक्षा जास्त धावांचा टप्पा गाठून दिला. राहुलने नाबाद 111 धावांच्या खेळीत 106 चेंडूत 12 चौकार व 2 षटकार फटकावले.
कोहलीनेही शतक साजरे करताना नाबाद 122 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 94 चेंडूत 9 चौकार व 3 षटकार फटकावले. या जोडीने पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या गड्यासाठी 233 धावांची विक्रमी भागीदारी केली. पाकिस्तानकडून शादाब खान व शाहीन शाह आफ्रीदी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
राहुलचे शतकी पुनरागमन
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल याने तब्बल चार महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. त्याने दमदार शतक फटकावताना आपले पुनरागमन साजरेही केले. मांडीवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो चार महिने क्रिकेटपासून दूर होता मात्र, त्याच्या खेळीत आत्मविश्वास होता व त्यानेच पहिल्यांदा पाकिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत त्यांचे खच्चीकरण केले.
कोहली बनला 13 हजारी मनसबदार
विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील 278 वा सामना खेळताना 267 डावांत 47 वे शतक साजरे केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी कोहलीला दोन शतकांची गरज आहे. तर हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी तीन शतकांची आवश्यकता आहे.
शाहीनची हवाच काढली
शाहीन शाह आफ्रीदी नावाचे दडपण भारतीय फलंदाजांवर बसले होते. मात्र, पहिल्यांदा रोहित व गिल यांनी तर नंतर कोहली व राहुल यांनी त्याला ठरवून लक्ष्य केल्यासारखी आक्रमक टोलेबाजी केली व त्याच्या गोलंदाजीतील हवाच काढून टाकली. त्याने या लढतीत 10 षटकांत 79 धावा वसूल केल्या.