कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रविवारच्या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवल्यामुळे श्रीलंका व बांगलादेश क्रिकेट मंडळाने आशिया क्रिकेट समितीवर (एसीसी) टीका केली आहे. या दोनच संघांसाठी स्पर्धा आहे का, असा सवालही बांगलादेश मंडळाने केला आहे.
या स्पर्धेच्या सुपर फोर गटाचे सामने तसेच अंतिम सामनाही कोलंबोतच होणार आहे. रविवारच्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी 11 सप्टेंबर हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आल्याचे एसीसीने जाहीर केल्यावर लगेचच ही टीका सुरू झाली आहे. या सामन्याशिवाय सुपरफोर गटाच्या अन्य कोणत्याही सामन्यात राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला किंवा सामना पूर्ण होऊ शकला नाही तर गुण बहाल केले जाणार आहेत. मात्र, राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. या निर्णयावर दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांनीही नाराजी व्यक्त केली.
स्पर्धा सुरु झाल्यानंतर अचानक काही निर्णय बदलणे मला तरी पसंत पडलेले नाही. जर भारत व पाकिस्तान यांच्यातील लढतीसाठी राखीव दिवला गेला आहे तर आमच्या सामन्यांसाठीही तशी व्यवस्था केली पाहीजे, असे मत बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघे यांनी व्यक्त केले आहे.
आम्ही सहयजमान असूनही आमच्या सामन्यांसाठी राखीव दिवस का ठेवला गेला नाही. जर श्रीलंकेत या काळात पावसाचे प्रमाण जास्त असते तर संपूर्ण स्पर्धेतील प्रत्येक लढतीसाठी राखीव दिवस ठेवायला हवा होता. मात्र, आम्ही निर्णय घेणारे नसून एसीसीने सर्व निर्णय घेतले आहेत व ते आता सगळ्याच संघांना पसंत असतीलच असे नाही, असे श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड म्हणाले.
श्रीलंका संघाच्या प्रशिक्षकांच्या एकदम विरोधी मत श्रीलंका क्रिकेट मंडळाने व्यक्त केले आहे. एसीसीने घेतलेले निर्णय सहयजमान म्हमून आम्हाला मान्य करावे लागले आहेत. आम्ही जरी काही सामन्यांचे आयोजन करत असलो तरीही त्याबाबतच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हक्त आमच्याकडे नाही, असे मंडळाने म्हटले आहे.
प्रायोजक व वाहिनीचा दबाव…
भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना अत्यंत रोमहर्षक व चाहत्यांसाठी तसेच सगळ्यांसाठीच अत्यंत महत्वाचा असतो. तसेच स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करत असलेली वाहिनी, प्रायोजक यांचाही दबाव असतो. स्पर्धेतील सर्वाधीक पैसा मिळवून देणारा सामना जर पावसामुळे वाया गेला तर या प्रायोजकांचे, वाहिनीचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्यामुळेच या सामन्यासाठी तसेच अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा एसीसीने केला आहे.