Nepal vs India Asia Cup 2023 : आशिया चषकात भारताचा दुसरा सामना नेपाळविरूध्द होता. भारत आणि नेपाळ यांच्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर भारताने नेपाळचा दहा विकेटने पराभव केला. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकात 230 धावा केल्या होत्या. यानंतर पावसामुळे बराच वेळ खेळ थांबला होता.
पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार (DLS) भारताला विजयासाठी 23 षटकात 145 धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान सहज पार केले. भारताने 20.1 षटकात बिनबाद 147 धावां करत सहज विजय साकार केला. रोहित शर्माने 59 चेंडूत नाबाद 74(6 चौकार,5 षटकार) तर शुभमन गिल याने नाबाद 67 धावांची खेळी केली.
स्पर्धेत अ-गटा मधून पाकिस्तानने पहिले स्थान तर भारताने दुसरे स्थान मिळवत सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा सुपर फोरमध्ये पोहोचण्याचा मार्ग अद्याप खुला आहे. सुपर फोर फेरी 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे अन् त्यानुसार 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल.
तत्पूर्वी, टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आसिफ शेख आणि सोमपाल कामी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर नेपाळने भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या नवशिक्या संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारताला 48.2 षटके लागली. नेपाळच्या संघाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला आणि 230 धावा केल्या.
नेपाळकडून आसिफने शानदार फलंदाजी केली आणि 97 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. तर सोमपाल कामीने 56 चेंडूत 48 धावा केल्या. या खेळीत त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. कुशाल भुर्तेल याने 25 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. दीपेंद्र सिंह एयरी याने 25 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 29 धावांची खेळी केली.
नेपाळसारख्या संघाला बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाज धडपडताना दिसले. भारतीय गोलंदाजांची ही कामगिरी पाहता विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खूपच निराशाजनक होते. पहिल्या काही षटकांमध्ये श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि इशान किशन यांनी तीन सोपे झेल सोडले.
भारताकडून गोलंदाजीत सिराज आणि जडेजाने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या तर शमी, हार्दिक आणि शार्दुलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. सिराजने तीन विकेट घेतल्या, पण त्याने 9.2 षटकात 61 धावा दिल्या. शार्दुलने चार षटकांत 26 धावा दिल्या.