ब्लोएमफोन्टेम – भारताच्या युवा संघाची (१९ वर्षांखालील) आज (शुक्रवार) तुलनेने दुबळ्या नेपाळशी लढत होत आहे. आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील ही लढत भारतीय संघाने जिंकली तर ते उपांत्य फेरीत दाखल होतील. सलग विजयी मार्गावर असलेल्या भारतीय संघाचा हा सुपर सहा गटातील अखेरचा साखळी सामना आहे.
या स्पर्धेच्या गुणतालिकेत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान जरी सहा गुणांसह पहिल्या क्रमांकावर दावेदारी सांगत असला तरीही सरस नेट रनरेटसह भारतीय संघ सुपर सहा गटातील क्रमांक दोनमध्ये अव्वल स्थानी आहे. उदय सहरानच्या नेतृत्वाखालील संघ आतापर्यंत या स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे. हेच सातत्य नेपाळविरुद्धही राखण्यासाठी ते सज्ज आहेत.
दरम्यान, भारताने आपल्या सुपर सिक्स गट-1 मधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत आठ गडी गमावून 295 धावा केल्या होत्या. मुशीर खानने 131 धावांची खेळी केली होती. तर, आदर्श सिंगने 52 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघ 28.1 षटकांत 81 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सनने (19) सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून सौमी पांडेने चार विकेट घेतल्या. तर मुशीर खान आणि राज लिंबानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.