दुबई – भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दुखापतीमुळे आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतली असल्यामुळे त्याच्याजागी कोणाची वर्णी लागणार असा प्रश्न होता मात्र, बीसीसीआयने हार्दिक पंड्यावरच विश्वास दाखवला आहे.
बुमराहच्या अनुपस्थितीत पंड्या हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचेही बीसीसीआयने म्हटले आहे. पंड्याने दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त होऊन भारतीय संघात पुनरागमन केले व सातत्याने सरस कामगिरी करत आगामी आशिया स्पर्धेसाठी सज्ज असल्याचेही दाखवून दिले आहे. त्यामुळे त्याच्या अष्टपैलुत्वामुळे भारतीय संघाची ताकदही वाढली आहे.
दरम्यान, आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सहावा संघ निश्चित झाला आहे. हा संघ हॉंगकॉंगचा असून त्यांनी संयुक्त अरब अमिराती संघाचा पात्रता सामन्यात 8 गडी राखून पराभव करत आशिया स्पर्धेत स्थान मिळवले.
आशिया करंडक स्पर्धा येत्या शनिवारपासून सुरु होत आहे. स्पर्धेच्या सलामीचा सामना शनिवारी श्रीलंका व अफगाणिस्तानमध्ये होणार आहे. तर, रविवारी भारत व पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत होणार आहे.