मुंबई – शेअर बाजारात सकाळी बऱ्यापैकी खरेदी होऊन निर्देशांक वाढले होते. मात्र बाजार बंद होताना माहिती तंत्रज्ञान आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे कालच्या तुलनेत शेअर बाजार निर्देशांकात घट नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 310 अंकांनी कमी 58,774 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी म्हणजे 0.47 टक्क्यांनी कमी होऊन 17,522 अंकावर बंद झाला.
बजाज फायनान्स, इंडसइंड बॅंक, इन्फोसिस, पावर ग्रीड, ऍक्सिस बॅंक, एनटीपीसी,एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. मारुती सुझुकी, स्टेट बॅंक, डॉक्टर रेड्डीज, टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. दक्षिण कोरिया, जपान, हॉंगकॉंग आणि चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. युरोप आणि अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांकही वाढले होते. मात्र भारतीय शेअर बाजारात अखेरच्या सत्रामध्ये विक्री झाल्यामुळे निर्देशांकात घट झाली. दरम्यान बुधवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केवळ 23 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या अस्थिर आहेत. निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत तर काही गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. या आठवड्यात पहिल्या तीमाहिच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर होणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे.
अस्थिरतेची कारणे
अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावत असताना फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल शुक्रवारी जॅक्सन होल येथे भाष्य करणार आहेत. त्याकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी होईल. त्याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. भारताच्या पहिल्या तिमाईचा विकास दर 31 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. तेल उत्पादक संघटना उत्पादन कमी करणार असल्यामुळे कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर पेक्षा जास्त झाले आहेत. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यात 6,539 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. या संस्था पुढे काय करतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. मात्र याच काळात परदेशी संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत.