दुबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना भारत व पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघातील लढतीची उत्सुकता वाढली आहे. त्यातच या सामन्यासाठीची तिकीट विक्री झाली असून अनेक ठिकाणी या तिकिटांचा काळाबाजारही सुरू झाल्याचे समोर येत आहे.
या सामन्यासाठी 250, 700, 2500 व 5500 या रकमेची तिकिटे उपलब्ध होती, ही सर्व विकली गेली आहेत. आता याच रकमेच्या तिप्पट रकमेत या तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला आहे.
याबाबत आशियाई क्रिकेट परिषद तसेच आयसीसीने अशी तिकिटे खरेदी केलेल्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अशी मल्टीसेल तिकिटे लगेचच ओळखता येतात त्यामुळे ती कोणी खरेदी करू नये, असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आशिया करंडक स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना येत्या 28 ऑगस्टला होणार आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते या सामन्यासाठी खूप उत्सुक असतात. या सामन्याच्या तिकिटांची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू झाली आणि अवघ्या काही वेळातच पहिल्या गटवारीची सर्व तिकिटे विकली गेली होती.
दुबईत होणाऱ्यास भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे, त्यामुळे तिकीट विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला. मागणी जास्त असल्याने कंपनीने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तिकिटांची विक्री केली.