पिंपरी, (प्रतिनिधी) – संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल भगवंतावरील प्रेमापोटी दरवर्षी लाखो भाविक देहू ते पंढरपूर प्रवास करतात. विठुरायाच्या भक्तीत लीन झालेल्या वारकऱ्यांना कोणतीही बाधा रोखू शकत नाही. याची अनेक उदाहरणे वारीत पहावयास मिळतात.
पायांनी चालता येत नसले तरी तीनचाकी सायकल घेऊन वारी करणारे वारकरी महाराष्ट्राच्या या प्राचीन परंपरेची महत्ता विषद करतात. गेल्या सोळा वर्षांपासून एक दिव्यांग वारकरी तीन चाकी सायकलवर वारी करत आहेत.
पालखी सोहळ्यात दिव्यांग वारकऱ्याचा विशेष सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील बाळासाहेब वामन काळभोर हे दिव्यांग भाविक गेली सोळा वर्षांपासून या सोहळ्यात तीन चाकी सायकलवरून सहभागी होत आहेत.
लोणी काळभोरमधील दिंडीमध्ये त्यांचा सहभाग आहे. तुकोबारायांवरील श्रद्धेपोटी अध्यात्माची ओढ लागली. त्यातूनच पायी वारीत करत असून, अहोरात्र होणाऱ्या हरिनामाच्या गजराने मानसिक समाधान लाभत असल्याचे काळभोर यांनी सांगितले.