जळगाव – यंदा करोनाचे संकट टळल्यानंतर पुन्हा एकदा वारकऱ्यांना पालखी सोहळ्यासोबत पंढरीची वाट चालायचे वेध लागले आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनला प्रस्थान होणार आहे. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजे समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होणार आहे. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीला वेग आला आहे. 10 जुलैला आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे दर्शन घेण्यासाठी प्रस्थान करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार शेकडो दिंड्या, पालख्या आणि लाखो वारकरी पायी प्रवास करून मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे रवाना होत असतात. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या समाधीस्थळापासून संत मुक्ताईची पालखी ही पंढरपूरकडे जाण्याची परंपरा आहे. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
3 जूनपासून 34 दिवसांचा प्रवास करून तापी तिरावरून भीमा तीरावर ही पालखी जाणार आहे. 34 गावांच्या प्रवासात प्रत्येक मुक्कामा ठिकाणी भजन, कीर्तन,प्रवचन आणि प्रसाद आयोजित केला जातो. यामध्ये स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. आषाढी एकादशी निमित्ताने सर्व संतांच्या पालख्या या वाखरी येथे एकत्र येत असतात. या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात या सर्व पालख्यांचे स्वागत केले जात असते.
दरनम्यान, मागील दोन वर्षांत करोनामुळे पालखी सोहळ्यावर काही निर्बंध घालण्यात आले. मात्र तरीही मर्यादित वारकऱ्यांच्यामध्ये ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. तीन शतकाहून अधिक काळापासून संत मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करण्याची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार 3 जूनला पालखी पंढरपूरकडे रवाना होण्यापूर्वीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.