जामखेड (प्रतिनिधी) – गेल्या दोन-तीन दिवसापासून समाधानकारक पाऊस पडल्याने जामखेड तालुक्यात शेती कामाला गती आली आहे. यात कपाशी, ऊस,,बाजरी,तुर, मका लागवडीसह उडीद, मुग व कडधान्य पिकांची पेरणी करण्यात येत आहे. योग्य वेळी पेरणी झाली की पिकाचे उत्पादनही वाढते. त्यामुळे पाऊस झाल्याने शेती कामाची गती वाढली आहे.
खरीप पेरणीसाठी शेती मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले होते. गेल्या तीन दिवसात तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर गर्दी होत आहे. यंदा कपाशीसह उडीद, मूग, कांदा, बाजरी, मका पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. उर्वरित क्षेत्रात सोयाबीन, तुर, ऊस, कडधान्य आदी पिकांची लागवड होणार आहे. शेतकऱ्यांचा कपाशी पिकाकडे सर्वाधिक कल दिसत आहे. आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार व तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. शेती बांधावर जाऊन लागवडीबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे.
त्यात पिकांची लागवड कशी करावी, खतांचा कसा वापर करावा, किडींवर कशा प्रकारे नियंत्रण करावे अळ्या व किटक कसे ओळखावे, किडीसाठी काम गंध सापळ्याचा वापर कसा करावा आदींचा समावेश आहे. विविध प्रकारचे मार्गदर्शनपर फलकही ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालयासमोर व अन्य ठिकाणी चिटकवण्यात आले आहेत.
पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर बियाणे, खते खरेदी करत असून काही ठिकाणी जास्त दराने खते विक्री होत आहे. कृषी विभागाने जास्त दराने खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करावी, शेतकऱ्यांनीही दुकानदाराकडून मूळ बिल घ्यावेत.
अमृत महाराज डूचे शेतकरी, खूरदैठण