मुंबई – हिंदी चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आणि ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन कानला आजही मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळू शकला नाही. आर्यन खानने दाखल केलेल्या जामिनासाठीच्या अर्जावरील सुनावणी उद्याही सुरू राहणार आहे. त्यावेळी या विषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्याधीश एन.डब्लू सांबरे यांच्यासमोर आज आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरूवात झाली. या प्रकरणी केंद्र सरकारचे माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी आणि सतिश माणेकशिंदे यांनी आर्यन खानची बाजू मांडली. आर्यन खानविरोधात “एनसीबी’कडे कोणताही पुरावा नाही, असा दावा यावेळी करण्यात आला. आर्यनला चुकून अटक करण्यात आले असून 20 दिवस तुरुंगात डांबण्यात आले आहे, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले.
आर्यन खानने ड्रग्जचे सेवन केल्याचा किंवा त्याने ड्रग्ज बाळगल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच “एनसीबी’ने दावा केल्याप्रमाणे कथित कारस्थानात तो सहभागी असल्याचाही कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे रोहतगी यांनी सांगितले.
रोहतगी यांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी उद्याही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. सहआरोपी असलेल्या अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावरही उद्या सुनावणी होणार आहे. “एनसीबी’च्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे देखील उद्या बाजू मांडणार आहेत.
20 ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये त्याची न्यायालयीन कोठडी कायम केली होती. त्यामुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढला होता.
दरम्यान, येत्या 1 नोव्हेंबरपासून न्यायालये दिवाळी सुट्टीमुळे बंद राहणार आहेत. पुढचे दोन आठवडे न्यायालय बंद राहणार असल्यामुळे या तीन दिवसांत आर्यन खानला जामीन न मिळाल्यास त्याचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढू शकतो. त्यामुळे आता मुकुल रोहतगी यांच्याकडे आर्यन खानचे वकीलपत्र सोपवण्यात आले आहे.