मुंबई – बऱ्याच औषध कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले. सकाळच्या सत्रात रुपया मजबूत राहिला. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. या कारणामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात भरीव वाढ नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 383 अंकांनी वाढून 61,350 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 143 अंकांनी वाढून 18,268 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबराच टाटा स्टील, नेस्ले, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, कोटक बॅंक या बड्या कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले. मात्र या तेजीच्या वातावरणात इंडसइंड बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, पावर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, डॉक्टर रेड्डी, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
रेलीगेअर या संस्थेचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, देशांतर्गत परिस्थिती सुधारण्याबरोबरच जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे खरेदी-विक्रीच्या लाटा आल्या तरी निर्देशांकामध्ये दिवसाखेर बरीच वाढ नोंदली गेली. मात्र निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे आगामी काळातही गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्यता आहे.
वाहन, रिऍल्टी, धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आणखीही विक्री करीत असल्याचे वातावरण शेअर बाजारात आहे. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅप 2.20 टक्क्यांपर्यंत वाढले