नवी दिल्ली: पुण्यातली एल्गार परिषद आणि भीमा कोरेगावची दंगल या प्रकरणात एनआयएने काल दिल्ली विद्यापीठाच्या एका सहयोगी प्राध्यापकाला अटक केली. त्याच्या विरोधात प्रख्यात लेखिका अरूंधती रॉय यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने विचारवंतांवर चालवलेली ही दडपशाही आहे असे त्यांनी म्हटले आहे.
जातीयवाद विरोधातील, भांडवलशाहीच्या विरोधातील सेक्युलर विचारांच्या कार्यकर्त्यांना हिंदूराष्ट्रवादी राजकारणाने प्रेरित होऊन हे सरकार दमात घेण्याचा प्रयत्न करीत आहे असेही रॉय यांनी म्हटले आहे.
एनआयएने काल दिल्ली विद्यापीठातील इंग्रजी विभागातील एक सहयोगी प्राध्यापक हॅनी बाबू यांना नक्षली विचारसरणीचा प्रसार केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात त्यांच्यावर कट रचल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे. त्यावरून सरकारवर टीका करताना अरूंधती रॉय यांनी म्हटले आहे की सरकार मुक्त विचारांचे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, जातीयवादाच्या विरोधात आवाज उठवणारे लोक यांच्यावर सर्रास दडपशाही करीत आहे. हिंदू राष्ट्रवादाचा हा विनाशकारी प्रलय आहे, त्यातून देशापुढे मोठेच संकट उभे राहात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेनेही बाबू यांच्या अटकेचा निषेध केला आहे. फक्त विरोधी विचारवंत आणि विरोधी कार्यकर्त्यांना अडकवायचे या एकाच हेतून भीमा कोरेगाव प्रकरणात कारवाई केली जात आहे, असा आरोप या संघटनेनेही केला आहे.