मुंबई – मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने मुंबई महापालिकेने आता कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले असून याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर थेट अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेने परिपत्रक जारी केल आहे.
राज्यभरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या आता शंभराने वाढत आहे. यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे मुंबईमध्ये आढळले आहेत. याबाबत शासनाकडून वारंवार विनंती करण्यात येत असतानाही काही ठिकाणी गर्दी होताना तसेच लोक मास्क वापरत नसल्याचे दिसून आले आहे. करोनाच्या वाढत्या संकटात देखील काहीजण गंभीर नसल्याचे दिसून आल्याने अखेर महापालिकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
रस्त्यावर, मार्केट, हॉस्पिटल, ऑफिस कुठेही जाणाऱ्या लोकांनी मास्क वापरावे. खासगी किंवा ऑफिसच्या वाहनात फिरणाऱ्या लोकांनीही मास्क वापरावा. तसेच कोणतीही बैठक तसेच कार्यालयात उपस्थित राहताना मास्क वापरावा, असे आदेश यात देण्यात आले आहेत. जे लोक या आदेशाला जुमानणार नाहीत, जे लोक हे नियम पाळणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार आहे. यासाठी विकत आणलेला मास्क तर चालेलच शिवाय चांगला घरगुती मास्कही चालेल, असे देखील सांगण्यात आले आहे.