मुंबई – महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचे विधानसभेतही पडसाद पडले असून विरोधकांनी भिडे यांना अटक करण्याची मागणी जोर लावून धरली.
संभाजी भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.
दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे संतप्त पडसाद उमटले. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्याकडे विधानसभेचं लक्ष केंद्रीत केलं. यावेळी मनोहर भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. चव्हाण म्हणाले, काल अमरावतीत संभाजी भिडे नावाच्या एका गृहस्थाने राष्ट्रपित्याबद्दल अत्यंत निंदापूर्वक, नालस्तीपूर्वक विधान केलं आहे. आपण त्याची माहिती घेतली असेल. अशा प्रकारची समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला आयपीसी 153 किंवा जो काही कलम असेल त्यानुसार ताबडतोब अटक केली पाहिजे. समाजात दंगेधोपे आणि तणाव निर्माण करण्याचा या व्यक्तिचा जाणूनबुजून प्रयत्न असतो. हा पहिल्यांदाच केला नाही. यापूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केला आहे.
चव्हाण यांच्या या मागणीची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दखल घेतली. माहिती घेऊन या प्रकरणी उचित कारवाई केली जाईल, असे नार्वेकर म्हणाले. या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. या प्रकरणाची शहानिशा करू. तपास करून योग्य ती कारवाई करू. अध्यक्षांनी सूचना दिल्या आहेत. तपासणी होईल. गांभीर्य पाहू आणि कारवाई करू.
याचवेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भिडे यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे. जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असे बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा थोरात यांनी दिला.