कोलकाता – करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात पश्चिम बंगालमध्ये देशाच्या विविध भागातून परत आलेल्या तरूणांना भूमिपुत्र ऍपद्वारे आयटी क्षेत्रात तब्बल आठ हजार रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याच्या आयटी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
कोविड लॉकडाऊनच्या काळात अनेक क्षेत्रातील कामगारांचे स्थलांतर झाले होते. त्यात आयटी क्षेत्रातील लोकही आपले नोकरीचे ठिकाण सोडून पश्चिम बंगाल मध्ये परतले होते. त्यांच्यासाठी राज्याच्या आयटी विभागाने हे ऍप लॉंच करून विशेष प्रयत्न सुरू केले.
कर्मभूमी ऍप वर कौशल्यावर आधारीत काम करू इच्छिणाऱ्यांची नाव नोंदणी केली गेली. त्यातून अनेक कंपन्यांनी आपल्याला योग्य असे कर्मचारी निवडले आणि त्यांच्या रोजगाराची सोय करण्यात आली.
नोकरी देणारे आणि नोकरी मागणारे अशा दोघांचीही येथे नाव नोंदणी करण्यात आली. त्यानुसार या ऍप वर 41 हजार युवकांनी रोजगारासाठी नाव नोंदणी केली. 400 कंपन्यांनीही येथे आपली नाव नोंदणी केली होती.