मुंबई : दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सिसोदियांच्या अटकेविरोधात आता दिल्ली मुंबईसह अनेक ठिकाणी आपकडून आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, सिसोदियांच्या अटकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी एक ट्विट केले असून या ट्विटची चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे.
आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विटमध्ये तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने राबवलेल्या मद्यधोरणावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. “ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे, तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती. तत्कालिन राज्य सरकारने विदेशी दारुवरील कर माफ केला होता. तसेच बार आणि पबच्या परवाना शुल्कातही सवलत देण्यात आली होती. किराणा दुकानात वाईन विकण्याची परवानगीही या सरकारने दिली होती”, असे म्हटले आहे.
तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये शेलार यांनी,“दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत आहेत का? महाराष्ट्रातही जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार का? आणि म्हणूनच अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते का?” असे प्रश्नदेखील त्यांनी विचारले आहेत.
दरम्यान, दोनच दिवसापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन भेट घेतली होती. या भेटीमुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या याच भेटीवरून आशिष शेलार यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.