कराड – कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेस नेत्यांनी स्थानिक मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळेच कॉंग्रेसला बहुमत मिळाले असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कर्नाटकमधील दोन विभागांतील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतल्या. तसेच तीन पत्रकार परिषदाही घेतल्या होत्या. त्यावेळी कॉंग्रेस पूर्ण बहुमताने कर्नाटकात सत्ता स्थापन करेल, अशीच परिस्थिती होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच हा निकाल लागला आहे, असे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण म्हणाले, “”जर आम्ही काठवर असतो, तर भाजपचा सत्तेसाठीचा घोडाबाजार झाला असता.
जो महाराष्ट्रासह अनेक राज्यात आपल्याला बघायला मिळाला आहे. ती शक्यता पूर्णपणे मावळली असून कर्नाटकच्या जनतेने भक्कम असे बहुमत कॉंग्रेसला दिले आहे. तरीसुद्धा काळजी घ्यावी लागेल आणि तशी कॉंग्रेसकडून तयारी सुद्धा दिसत आहे.”
कर्नाटकमधील भाजप सरकार पूर्ण भ्रष्टाचारी स्वरूपाचे सरकार होते. त्यांना उघडे करण्यात कर्नाटक कॉंग्रेसच्या नेत्यांना मोठे यश मिळाले आहे. भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची रेट लिस्टच कॉंग्रेसने वृत्तपत्रामधून प्रसिद्ध केली होती. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसकडून स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढविली गेली. बेरोजगारी व महागाई हे सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे विषय होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाच गॅरंटींना जनतेची साथ…
श्री. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “”कर्नाटकच्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून जाहीरनाम्यातून पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या. या पाच योजना म्हणजे 200 युनिट फ्रीमध्ये वीज, महिलांना 2 हजार रुपये महिना भत्ता, बीपीएल कुटुंबातील प्रती व्यक्ती 10 किलो धान्य, बेरोजगार असलेल्या पदवीधर युवकांना 3 हजार भत्ता, तर डिप्लोमा होल्डरना 1 हजार 500 रुपये भत्ता. या भत्त्यातून पुढील दोन वर्षात त्या युवकांला नोकरी मिळेपर्यंत ही रक्कम दिली जाईल. तसेच महिलांना राज्यात मोफत बससेवा, अशा योजना कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यातून कर्नाटकमधील जनतेला दिलासा मिळेल.” या योजनांना जनतेने चांगली साथ दिली, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.