सातारा – नाबार्ड आणि राज्यस्तरीय स्थायी समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील बँकांकडून शेतकर्यांना देण्यात येणार्या पीक कर्जांचे दर जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या सोमवारी (दि. 8) झालेल्या सभेत निश्चित करण्यात आले आहेत. समितीने सूचित केलेले दर इतर जिल्हा बँकांच्या तुलनेत आणि शेतकर्यांच्या गरजा पूर्ण करण्यास पर्याप्त असल्याने अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. गलांडे म्हणाले, शेतीपूरक व्यवसायात आणि कर्जपुरवठ्यात राष्ट्रियीकृत बँका आणि खाजगी बँकांच्या तुलनेत सातारा जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्याच्या अग्रणी बँकेने दिलेल्या जिल्ह्याच्या एकूण पतपुरवठा उद्दिष्टापैकी जिल्हा बँकेने पीक कर्ज उद्दिष्टाच्या 117 टक्के उद्दिष्ट पूर्तता गत वर्षी केली आहे. डॉ. सरकाळे यांनी जिल्हा बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
बँकेने सादर केलेली माहिती अभ्यासपूर्ण असल्याचे प्रशंसोद्गार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी काढले. जिल्ह्यात 2024-25 या वर्षासाठी पीक प्रकारानुसार 2.5 ते 25 टक्क्यांपर्यंत कर्जदरवाढीची शिफारस करण्यात आली. डाळिंब शेडनेट कर्जदरात वाढ आणि सफरचंद व ड्रॅगनफ्रूटसाठीही कर्जपुरवठ्याची शिफारस करण्यात आली. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेनंतर हे पीक कर्जदर एप्रिलपासून जिल्ह्यातील राष्ट्रियीकृत, खाजगी आणि जिल्हा बँकेला लागू होतील.
या सभेस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी जे. पी. शिंदे, कृषी विकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी दत्तात्रय येळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, दुग्ध विकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी रासकर, धुरगुडे, प्रकल्प संचालक (आत्मा) व्ही. एस. बंडगर, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी जाधव, बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचेभूषण यादगीरवार, जिल्हा बँक संचलित यशवंत किसान मंचचे रामदास कदम, निमंत्रित प्रगतिशील शेतकरी मनोहर साळुंखे, भीमराव इंगवले, मदन भोसले, प्रवीण अनपट, सचिन शेलार, निमंत्रित सचिव जयहनुमान घाडगे, जगन्नाथ साळुंखे, गणेश निकम उपस्थित होते. जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांनी प्रास्ताविक केले. योगेश पाटील यांनी आभार मानले.