मुंबई – मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांच्या जागी आता वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस कार्यालयासमोरील सभागृहात असंघटित कामगारांचा जाहीर मेळावा सुरू असतानाच जगताप यांना पदावरून हटविण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा निर्णय घेतला आहे. आगामी मुंबई महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा बदल केला आहे. महिला व दलित समाजात असणारा पाठिंबा, राज्य सरकारमध्ये विविध मंत्रीपदावर काम करण्याचा अनुभव असल्याने वर्षा गायकवाड यांना ही संधी देण्यात आली आहे.
याशिवाय विधानपरिषद निवडणुकीत पक्षाने चंद्रकांत हंडोरे यांना मतांचा कोटा ठरवून विजयी करण्याचे निश्चित केले होते. तरीही जगताप यांनी स्वतःकडे मते खेचल्याने हंडोरेंचा पराभव झाल्याचे म्हंटले जात आहे. यामुळे दलित समाज नाराज होता. याचबरोबर गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी शक्तीसिंह गोहिल आणि पाँडेचरी प्रदेशाध्यक्षपदी व्ही. वैथिलिंगम यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
वर्षा गायकवाड यांचा परिचय
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या वर्षा गायकवाड या कन्या आहे.
- २००४ पासून सलग चार वेळा त्या धारावी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
- २०१० ते २०१४ या काळात महिला व बालविकासमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून काम केले.
- २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये शालेय शिक्षणमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्रिपद भूषिवले.
- मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाचे काम पाहिले.