मुंबई – राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या(सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्याने राज्याला पुढील काही दिवस मुख्य पोलीस महासंचालक नसणार आहेत.
सध्या मुख्य पोलीस महासंचालक यांचा तत्पुरता चार्ज कोणाकडेही देण्यात आलेला नाही. आता नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीबाबत यूपीएससीला राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यादी पाठवली. त्यांच्या शिफारसी आल्यानंतर राज्याला नवा पोलीस महासंचालक लाभणार आहे.
जयस्वाल हे दीड वर्षापासून महासंचालकपदावर होते. त्यांचे आणि राज्य सरकारमधील काही मंत्र्यांशी बिघडल्याने ते अस्वस्थ होते. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी केंद्र सरकारकडे पुन्हा सेवेत येण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर केंद्र सरकारने राज्य सरकारची सहमती आहे का, हे जाणून घेण्यासाठी पत्र पाठवले होते.
राज्य सरकारने त्यास तात्काळ मंजुरी दिली. यामुळे काल केंद्र सरकारने सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती केली.
सुबोध कुमार जयस्वाल हे केंद्रात गेल्याने आता त्यांच्या जागी कोण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता राज्य सरकारला नवा पोलीस महासंचालक शोधावा लागणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक हे पद फार महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.