अहमदाबाद –माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज अजित आगरकर याला पद्धतशीरपणे डावलून चेतन शर्मा यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आगरकर यांची अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, गुरुवारी बीसीसीआयच्या बैठकीत शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले व अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या संपूर्ण चर्चेत चेतन शर्मा यांचे नाव एकदाही घेतले गेले नव्हते.
बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज तीन जणांच्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये चेतन शर्मा निवड समितीचे अध्यक्ष बनले तर, ऍबी कुरुविल्ला आणि देवाशिष मोहंती हे निवड समितीचे अन्य दोन सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. या पदासाठी सल्लागार समितीने ज्यांची नावे निश्चित केली होती, त्यात सर्वाधिक सामने आगरकरच्या नावावर होते. मात्र, तरीही त्याला डावलले गेले. मदन लाल, रुद्र प्रताप सिंग व सुलक्षणा नाईक यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीने शर्मा यांच्या नावाची शिफारस केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शर्मा यांची मुदत केवळ एक वर्षाचीच असल्याने हा निर्णय कसा घेतला गेला यावरही आता प्रश्न निर्माण झाले आहेत.
भारतीय संघाच्या निवड समितीसाठी आगरकरबरोबरच चेतन शर्मा, मनिंदर सिंग, ऍबी कुरुविल्ला, शिवसुंदर दास, देबाशिष मोहंती, रणदेब बोस, नयन मोंगिया, विजय दाहिया यांनी अर्ज केले होते. यामधून पाच जणांची सल्लागार समितीने केली होती. या पाच माजी खेळाडूंमधून तिघांना निवड समिती सदस्य म्हणून संधी दिली आहे. पण ज्या पाच खेळाडूंची सल्लागार समितीने निवड केली होती, त्यामध्ये सर्वाधिक सामने हे अजित आगरकरच्या नावावर होते. त्यामुळे आगरकरची निवड करण्यात का आली नाही, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलेला आहे.
चेतन शर्मा यांनी 88 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. 54 वर्षीय शर्मा यांनी जानेवारी महिन्यातच निवड समितीसाठी अर्ज केला होता. पण विद्यमान समितीतील दक्षिण विभागाच्या एमएसके प्रसाद यांची जागा सुनील जोशी यांनी घेतली. त्याचबरोबर गगन खोडाच्या जागी हरविंदर सिंगची निवड केली गेली होती. मात्र, संपूर्ण प्रक्रियेत शर्मा यांचे नावही घेतले गेले नव्हते, तरीही त्यांची निवड झाली याबाबत आता विविध स्तरावर टीका सुरू झाली आहे.