भारतीय क्रिकेटमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर काही आश्वासक बदल घडले. मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींच्या जागी राहुल द्रविडची नियुक्ती केली गेली. तसेच विराट कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यावर रोहित शर्माकडे ही जबाबदारी दिली गेली. आता पुढचा काळ रोहित-राहुल जोडीचा राहणार आहे. मात्र, जवळपास प्रत्येक तीन दिवसांनी एक सामना खेळत असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंवरचा वर्कलोड कमी होणार का हा मुद्दा मात्र, अद्याप कायम आहे.
करोनाचा कालखंड संपूर्ण क्रिकेटवर्तुळासाठी निराशाजनक ठरला होता. त्यातून बाहेर आल्यावर विविध देशांत स्पर्धा, मालिका व दौरे सुरू झाले. “कधी नाही मिळालं आणि गटकन गिळलं’, या उक्तीनुसार बीसीसीआयने खेळाडूंना दावणीला बांधण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम पुन्हा एकदा हाती घेतला. अन्य काळात व आताच्या काळात हाच फरक आहे की जिथे खेळाडूंवरील ताणाचा विषय चर्चेत येताना दिसला. याला कारणही तसेच आहे मुळातच करोनाच्या भीतीपोटी या सगळ्याच स्पर्धांमध्ये अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे भारतीय खेळाडूंनाही सातत्याने बायोबबलमध्येच राहावे लागत आहे.
या सुरक्षा कड्याची नितांत गरज आहे हे देखील मान्य पण कित्येक महिने अशा वातावरणात राहिल्यावर खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होतो हेच वारंवार सिद्धही झाले. जागतिक क्रिकेटमध्ये एकेकाळी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे दोनच देश मोठ्या प्रमाणावर व्यस्त असायचे. आता त्यांची जागा भारतीय संघाने घेतली आहे. त्यातच एकदिवसीय व कसोटी क्रिकेटच्या बरोबरीने आता टी-20 क्रिकेटचेही कुंभमेळे भरवले जातात त्यामुळे उसंत नावाचा शब्दच खेळाडू विसरले आहेत.
एक संघ जर दरवर्षी 6 ते 7 कसोटी सामने, 40 ते 50 एकदिवसीय सामने व 10 ते 15 टी-20 सामने खेळत असेल व त्यासाठी सातत्याने प्रवास करत असेल व बायोबबलमध्येच राहत असेल तर जगातील कोणताही काउंन्सीलर मानसिकता सकारात्मक राखण्यासाठी उपयोगी ठरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
सातत्याने दौरे व प्रवास
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापासून सुरू झालेला भारतीय संघाचा प्रवास आता मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपर्यंत अविरत सुरू आहे. त्यातही न्यूझीलंडचा दौरा मुळात का ठरवला गेला याचेही उत्तर बीसीसीआयकडून मिळालेले नाही. विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना 14 तारखेला खेळून न्यूझीलंडचा संघ भारतात 15 तारखेला दाखल झाला व केवळ दोनच दिवसांत पहिला टी-20 सामना खेळला गेला. या अवघ्या पाच दिवसांत वेगवेगळ्या शहरांत मिळून तीन सामने या दोन संघांनी खेळले.
विश्रांती व वर्कलोडमुळे कोहलीसह अन्य काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. काही खेळाडूंनी विश्वकरंडक स्पर्धेत दिवे लावल्यामुळे त्यांचे संघातील स्थानही गेले. मात्र, तरीही सेकंड बेंचला संधी देणार या नावाखाली पुन्हा एकदा खेळाडूंना नफेखोरी सिद्ध करत बीसीसीआयने वेठीस धरले. या सामन्यांसाठीचा प्रवास खरोखर दगदगीचा आहे.
त्यातही लगेचच सामनेही खेळायचे आहेत व त्यात चमकदार कामगिरी करून आपले संघातील स्थानही अबाधित राखायचे आहे या अशा तीनही आघाड्यांवर कसरत करून खेळाडूंना यशस्वी व्हायचे आहे. हे वाटते तितके सोपे नाही पण तरीही कारकीर्दीसाठी करावेच लागते. याला बीसीसीआयकडून काही ठोस पर्याय मिळणार का, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुखापती लपवण्याची मानसिकता
एकीकडे वर्कलोडचा मुद्दा कळीचा ठरत असतानाच खेळाडूंना संघातील स्थानाबाबतही दडपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच कित्येकदा खेळाडू विश्रांती हवी असतानाही ती घेत नाहीत. इतकेच नव्हे तर दुखापत झालेली असतानाही ती लपवतात. कारण 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात आजच्या घडीला प्रत्येक खेळाडूला किमान तीन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण विश्रांती घेतली किंवा एखाद्या मालिकेतून दुखापतीने माघार घेतली व बदली खेळाडूने चमकदार कामगिरी केली तर आपले संघातील स्थान धोक्यात येईल ही भीती खेळाडूंच्या मनात कायम असते व त्यातूनच हे लपवाछपवीचे प्रकार घडतात.
याला आळा घालण्याचे कोणतेही उपाय बीसीसीआय देखील राबवताना दिसत नाही. कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना एखाद्या मालिकेतून विश्रांतीच्या कारणाने सुट्टी व सवलत दिली जाते; पण मग बाकीच्यांचे काय. ज्यांची कारकीर्द नुकतीच सुरू झाली आहे त्यांच्यावर ही अपेक्षा पूर्ण करण्याचे ओझे कायम राहते.
लोढा समितीच्या नियमांचे काय झाले?
बीसीसीआयमधील एकूणच कार्यपद्धतीवर अंकूश राहावा यासाठी लोढा समितीची स्थापना केली गेली. एकाच वेळी दोन पदांवर कार्यरत राहता येणार नाही. तसेच परस्पर हितसंबंधांचा मुद्दाही लोढा समितीने कटाक्षाने राबवला आहे. पण मग हेच नियम वर्कलोडबाबत राबवले गेल्याचे दिसत नाही याचे कारण काय असावे. कोणतीही स्पर्धा किंवा मालिका संपल्यावर किमान आठ ते पंधरा दिवसांची विश्रांती दिली गेली पाहिजे.
हा नियम करोनानंतरच्या काळात सुरू झालेल्या स्पर्धांबाबत तसेच मालिकांबाबत अजिबात राबवला गेल्याचे दिसत नाही. मग निदान लोढा समितीच्या शिफारशींना निकालात काढले गेले असे तरी बीसीसीआयने जाहीर करावे. द्रविडला मुख्य प्रशिक्षक बनवले गेल्यावर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला व लोढा समितीचे नियम पाळले गेले मग वर्कलोडबाबतच्या नियमांना हरताळ का फासला जात आहे, हे कोणीतरी विचारणार का?
गांगुलीकडूनही भ्रमनिरास
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली आल्यावर खेळाडूंच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही किमान अपेक्षाही फोल ठरताना दिसत आहे. ज्या गांगुलीने संघातील नवोदितांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी आपल्या फलंदाजीच्या क्रमाचाही त्याग केला तोच गांगुली नफेखोर बनल्याचे स्पर्धांच्या वाढत्या संख्येतून स्पष्ट दिसत आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर त्याने केलेली आश्वासनेही हवेत विरल्याचेही समोर आले आहे.
कोणत्याही मालिकांबाबतचे नियोजन पाहता आपलेच गुरू व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याच पावलावर गांगुलीचाही प्रवास सुरू असल्याचे सहज लक्षात येते. याला नफा कमावण्याची नैसर्गिक वृत्तीच म्हणावे लागेल. कधीतरी अध्यक्षपदाचा सदरा बाजूला ठेवून खेळाडूंच्या विश्रांतीचा, त्यांच्या खासगी आयुष्याचा व त्यांच्या कामगिरीच्या आलेखाचा विचार गांगुली करेल का?
श्रीमंत मंडळाची मनमानी
आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून बीसीसीआयची ओळख आहे. जगातील अन्य कोणत्याही देशांत सामने झाले तरी त्यातून जी कमाई होते त्यातील एक संघ जर भारतीय संघ असेल तर त्याच्या किमान दसपट जास्त कमाई होते. त्यामुळेच विश्वकरंडक टी-20 स्पर्धा संपल्यावर लगेचच दोनच दिवसांत भारतात दाखल होत मालिका खेळण्यास न्यूझीलंडचा संघ तयार झाला. कारण बीसीसीआयला नाही म्हणण्याची ताकद आज तरी कोणत्याही संघात किंवा त्यांच्या देशाच्या क्रिकेट मंडळाकडे नाही. त्यामुळेच बीसीसीआयची मनमानी वाढत आहे व त्यात खेळाडूंना वेठीस धरले जात आहे.
कामगिरीवर विपरीत परिणाम
खेळाडूंना सतत व्यस्त राहावे लागत आहे. त्यातच सातत्याने बायोबबलमध्ये राहणे, सलग सामने खेळणे, कुटुंबियांपासून दूर राहणे, एका पाठोपाठ एक मालिका व दौरे करणे, त्यासाठी प्रचंड प्रवास करणे यातून भारतीय क्रिकेटची प्रगती होणार का, येत्या काळात अशाच मालिका खेळत राहून एक आजारी भारतीय संघ तयार होणार याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र, अशाच सततच्या क्रिकेटमुळे जे यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाच्या सुमार कामगिरीचे फळ मिळाले तेच चित्र आगामी सगळ्या मालिकांमध्येही दिसणार हे देखील स्पष्ट दिसत आहे. बीसीसीआयने एकदा तरी हे खेळाडू माणसे आहेत यंत्र नव्हे, हे लक्षात घेतले तरी परिस्थिती सुधारेल.
अमित डोंगरे