अलीकडील काही घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. सबंध जगाला आधी कोविड साथीनं छळलं आणि आता रशिया-युक्रेन युद्धाची झळ सर्वांना सोसावी लागत आहे. परिणामी अनेक राष्ट्रांची आर्थिक स्थिती खूपच खालावली आहे.
भारताच्या सभोवती असलेल्या देशांची आर्थिक परिस्थिती तर अगदी डबघाईला आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तौलनिकदृष्ट्या पाहिलं, तर भारताची आर्थिक स्थिती फार बिघडली नाही. आपली परकीय गंगाजळी मजबूत आहे आणि उत्पन्नवाढ आशादायक आहे.
मग आजूबाजूच्या राष्ट्रांचं असं का व्हावं? श्रीलंका दिवाळखोर आणि पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे तर नेपाळ, भूतान आणि बांगलादेशसमोर आर्थिक संकटं आ वासून उभी आहेत. म्यानमारमध्ये तर सगळ्या गोष्टींचीच मारामार! या संकटाची कारणमीमांसा जगभरातील अर्थतज्ज्ञ तर करत आहेतच; पण काही गोष्टी अगदी स्पष्टपणे माझ्या ध्यानात आल्या त्या मी इथे मांडत आहे.
या सगळ्या देशांमध्ये बांगलादेशची परिस्थिती त्यातल्या त्यात जरा चांगली आहे आणि त्यालाही कारणं आहेत. भारताला वेढून टाकणाऱ्या या बहुतेक देशांनी न परवडणारी कर्जं चीनकडून घेतलेली आहेत आणि ती परत करणं तर दूरच पण व्याज देणंही त्यांना अवघड होऊन बसलं आहे. हे तर त्यांच्या आर्थिक डबघाईचं कारण आहेच, पण मुळात प्रश्न असा निर्माण होतो की, ही कर्जं त्यांनी का घेतली?
एक तर जेव्हा सुस्थिती होती तेव्हा कर्जफेड सोपी वाटत होती आणि चीननं दाखवलेल्या टांगत्या गाजरामुळे सगळं काही ठीक होईल असं त्या राष्ट्रांना वाटलं; परंतु यापेक्षा खोलवर जाणारं एक कारण आहे. ते कारण म्हणजे संपदानिर्मिती (क्रिएशन ऑफ वेल्थ). या सर्व राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेकडे बारकाईनं पाहिलं की असं ध्यानात येईल की त्यांची संपदानिर्मिती अतिशय तकलादू आहे. श्रीलंकेचं अर्थकारण पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून होतं आणि कोविडमुळे त्याचा पूर्णपणे बोजवारा उडाला. त्या देशात कृषी-उत्पादन, वस्तुनिर्मिती किंवा इतर संपदानिर्मितीचे स्रोत जवळजवळ नाहीतच. त्यामुळे पर्यटन स्रोत आटल्यावर सगळंच संपलं. नेपाळ आणि भूतानची स्थिती अशीच आहे. पाकिस्तानात वस्तुनिर्मिती, कृषी-उत्पादन नगण्य, मोठमोठ्या प्रकल्पांवर आणि शस्त्रनिर्मिती तसंच न पेलणाऱ्या सेनेवर वारेमाप खर्च, असं चित्र असल्यानं तिथली अर्थव्यवस्था ढासळली नाही तरच नवल! असंच काहीसं चित्र म्यानमारमध्येही दिसेल.
बांगलादेशमध्ये परिस्थिती जरा बरी का आहे, तर वस्राचे उत्पादन, त्याची निर्यात. गेल्या वर्षी सुमारे 35 अब्ज डॉलर्स एवढी कपड्यांची निर्यात त्या देशानं केली. याला म्हणतात संपदानिर्मिती. बांगलादेश नैसर्गिक वायू या संसाधनात समृद्ध आहे. जगात या वायूच्या साठ्यांच्या क्रमवारीत बांगलादेशचा 42वा क्रमांक लागतो. मात्र त्याच्या निर्यातीसाठी कोणतीही सोय नसल्यानं केवळ सर्व वापर देशातच होतो. निर्यात केल्यास त्यांची अर्थव्यवस्था खूप सुधारू शकते. तथापि, कपड्यांच्या निर्यातीत फार कमी काळात बांगलादेशनं मोठी उडी घेतली आहे आणि आज या निर्यातीत त्यांचा जगात तिसरा क्रमांक लागतो. यावरून वस्तुनिर्मिती आणि त्यांची निर्यात यामुळे मोठी संपदानिर्मिती कशी होते, हे लक्षात येईल.
जशी तुम्ही गुंतवणूक एकाच माध्यमात करीत नाही तशीच अर्थव्यवस्थासुद्धा केवळ एका स्रोतावर उभी राहू शकत नाही. कृषी, वस्तुनिर्मिती, सॉफ्टवेअर आणि या सर्वांची निर्यात तसंच पर्यटन असे बहुविध पैलू असले तरच अर्थव्यवस्था टिकाऊ आणि मजबूत होते. भारतानं गेल्या काही वर्षांत हे ओळखल्यामुळे भारत उच्च पातळीची संपदानिर्मिती करीत आहे. यामुळेच विविध संकटं येऊनसुद्धा भारताची अर्थव्यवस्था शेजाऱ्यांसारखी कोलमडली नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आपल्या देशातील अनेक उद्योजकांनी संपदानिर्मितीत मोठा वाटा उचलला आहे. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात संपदानिर्मितीला काहीशी खीळ बसल्यानं देशाला मोठ्या अर्थसंकटाला सामोरं जावं लागलं. योग्य वेळी योग्य पावलं उचलल्यानं देश आता सुस्थितीत आहे, असं म्हणता येईल. आजमितीला 600 अब्ज डॉलर्सच्या परकीय गंगाजळीमुळे त्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो ही अभिमानाची गोष्ट आहे. टाटांच्या उद्योजकतेची माहिती देणाऱ्या आर. एम. लाला यांनी लिहिलेल्या “क्रिएशन ऑफ वेल्थ’ या पुस्तकानं संपदानिर्मितीचं मूल्य अधोरेखित केलं आहे.
– श्रीनिवास शारंगपाणी