जान्हवी आणि प्रकाश दोघेजण आनंदाने सान्हवीला शाळेत सोडायला गेले. कारण सान्हवीच्या शाळेचा पहिलाच दिवस होता. दोघांनाही असे वाटले की, सान्हवी शाळेत न जाण्याचा हट्ट करेल किंवा शाळेत गेल्यावर खूप रडेल. सान्हवी शाळेच्या गेटवर गेली तशी जान्हवीचा आणि प्रकाशचा हात सोडून लुटू लुटू पळत गेटच्या आत गेली. जान्हवी आणि प्रकाश दोघेही तिच्या मागे धावू लागले. सान्हवी लगेच थांबली आणि प्रकाश आणि जान्हवीला म्हणाली, “तुम्ही कशाला मला वर्गात सोडायला येता, मला माझा वर्ग माहिती आहे. तुम्ही नका मला सोडू, मी जाते माझ्या वर्गात.’ पण दोघांनाही असे वाटले की सान्हवी वर्गात गेल्यावर खूप रडेल म्हणून ते वर्गाच्या दारामागे उभे राहून पाहत होते. पण सान्हवीला खूप मज्जा वाटत होती वर्गात. ते पाहून दोघेही हसत हसत शाळेच्या बाहेर आले.
प्रकाश त्याच्या कामाला जातात त्याने जान्हवीला घरी सोडले. जान्हवी घरीच असायची. दोघांचा संसार खूप चांगला चालला होता. पाहता पाहता सान्हवी छोट्या वर्गातून मोठ्या वर्गात गेली. सान्हवी इयत्ता पहिलीला गेली होती. त्यामुळे ती स्वतःची कामे बऱ्यापैकी करत होती. त्यातच जान्हवीला पुन्हा दिवस गेले. प्रकाश जान्हवीची खूप काळजी घेत असे, सान्हवीची पण काळजी घेत असे. जान्हवीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप होते. जान्हवीने बाळाचे नाव ऋचा असे ठेवले. सान्हवी आणि ऋचा एकत्र खेळू बागडू लागल्या. एकत्र मोठ्या होऊ लागल्या.
नियतीच्या मनात बहुतेक काही वेगळेच होते. जान्हवीच्या आणि प्रकाशच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली, काय माहीत. कामावरून येताना प्रकाशला अपघात झाला आणि त्या अपघातात तो कोमात गेला. तो कोमातून बाहेर आला खरा परंतु काही दिवसांनी प्रकाशची प्राणज्योत मालवली. खूप मोठा आणि दुख:त प्रसंग जान्हवीवर ओढवला होता. सर्व अंधकारमय झालं होतं. जान्हवीच्या पदरात दोन मुली होत्या. वर्ष उलटले तरी जान्हवी एकदम शांत होती. कोणात मिसळायची नाही. घराच्या बाहेरच पडायचे नाही. डोळे एकदम निस्तेज कोरडे झाले, चेहरा सुकला.
मात्र घरात बसून काहीही होणार नाही हे तिला कळून चुकले होते. म्हणून जान्हवीने नोकरी करायचे ठरवले. अर्थात घरच्यांनी त्यासाठी तिला विरोध दर्शविला; पण तिने कोणाचे ऐकले नाही. ऋचा तशी लहानच होती. ऋचाला सांभाळण्यासाठी जान्हवीने तिच्या आईला घरी बोलावून घेतले. जेणेकरून जान्हवीला बाहेर नोकरी करायला घराबाहेर पडता येईल. सान्हवीला वडिलांची आठवण येत होती. ऋचा तशी खूपच लहान होती.
दिवस कसे पटापट पुढे गेले काही समजले नाही. सान्हवी आता 22 वर्षांची झाली आणि ऋचा 15 वर्षांची झाली होती. सान्हवीने शिक्षण पूर्ण करून ब्युटी पार्लरचा ऍडव्हान्स कोर्स करून स्वतःचे पार्लर टाकले होते. सान्हवी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनली.
मुलींना मोठे करण्यात जान्हवीचा खूप मोलाचा वाटा होता. तिने मुलींना वडिलांची उणीव कधीच भासू दिली नाही. जान्हवी कष्ट करून घर संसार आणि मुली साभाळून, त्यांचे शिक्षण, त्यांचे करिअर केले. मुलींना कोणाकडे हात पसरवण्याची गरज पडू दिली नाही. स्वतः जान्हवीने कधी कोणाकडे हात पसरले नाही. ती खूप स्वाभिमानी होती. म्हणूनच आज तिने तिच्या मुलींना स्वावलंबी बनवले. उच्च दर्जाचे शिक्षण दिले.
– मयुरी कदम-शिंदे