अपघात या शब्दाला काहीशी दु:खद किनार आहे. खरं तसं असायचं काही कारण नाही. संस्कृतमधील घात याच्या अनेक अर्थांपैकी एक अर्थ धक्का असा आहे. जो अनपेक्षित धक्का असतो त्याला अपघात असं म्हणतात. परंतु अपघात म्हटलं की आपल्यासमोर कुणी व्यक्ती जखमी होऊन विव्हळत पडली आहे असं दृश्य प्रकट होतं. अशी निगेटिव्ह धारणा असली की मोठी पंचाईत होऊन बसते.
माझ्या एका मित्राच्या घरी तार हा शब्द ऐकला रे ऐकला की ती तार कशाविषयी आहे हे बघण्याआधीच रडारड सुरू व्हायची. अनेक वर्षांपूर्वी हा मित्र माझ्याकडे बडोद्याला यायचा होता. त्या काळी पत्राशिवाय संपर्काची साधनं नव्हती आणि पत्र केव्हा पोचेल याचाही नेम नसायचा. त्याचा तिथला कार्यक्रम पक्का करून परतीची तिकिटं बुक करायचं काम माझ्याकडे होतं. सगळं व्यवस्थित “सेट’ झालं आहे आता निघायला हरकत नाही, असं तारेनं मी कळवल्यानंतर त्याच्या घरी तार न वाचताच रडारड सुरू झाली. नंतर हे ऐकल्यावर मला स्वत:ला हसावं की रडावं ते कळेना. अशीच काहीशी निगेटिव्हिटी “अपघात’ या शब्दाला निर्माण झाली आहे.
वास्तविक अपघातानं अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. पेनिसिलिन या अँटिबायॉटिक औषधाचा शोध अपघातानं लागलेला आहे. बुरशीवर संशोधन करताना चुकून एका डिशमध्ये बराच काळ बुरशी राहून गेली होती. सहज म्हणून त्या बुरशीचं संशोधक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केलं आणि त्यांना तिथे जंतूंची वाढ अजिबात होत नसल्याचं लक्षात आलं आणि पेनिसिलिनचा शोध लागला. मायक्रोवेव्ह ओव्हन, कृत्रिम मधुरक (आर्टिफिशियल स्वीटनर), वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण असलेले क्ष किरण, अनेक हृदयरोगांवर मात करणारा पेसमेकर, डायनामाइट, टेफ्लॉन असे अनेक महत्त्वाचे शोध अपघातानं लागलेले आहेत.
अपघातानं पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या व्यक्तीही आहेत. काही वर्षांपूर्वी आपले माजी पंतप्रधान यांची त्या पदावर कशी नियुक्ती झाली यावर “द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ असं पुस्तकही प्रसिद्ध झालं होतं. बडोद्याचे महाराजे सयाजीराव गायकवाड हेही अपघातानेच राजे झाले होते पण त्यांनी संधीचं सोनं केलं आणि त्यांच्या राज्याचा कायापालट केला.
अनपेक्षितपणे धक्का देणारी घटना म्हणजे अपघात. एखादा माणूस रस्ता ओलांडून पलीकडे जात असतो. तेव्हा त्याला आपल्याला एखादं वाहन जोरदार धक्का देईल अशी अपेक्षा नसते. तथापि, अचानक वेगानं येणाऱ्या वाहनाचा त्याला धक्का बसतो. हा अर्थातच अपघात आहे. विमानं कोसळतात, रेल्वेला अपघात होतात त्यावेळी तसं होणं अपेक्षित नसल्यानं ते अपघात ठरतात. नुकत्याच पूल कोसळून झालेल्या अपघातात शेकडो लोक मृत्युमुखी पडले. अपघातग्रस्त लोकांना असं घडेल याची अपेक्षा नव्हती. मात्र त्या पुलाची देखभाल करणाऱ्या लोकांना धोक्याची कल्पना होती त्यामुळे त्यांच्यासाठी हा अपघात नव्हता-ते दुर्लक्ष होतं. तरीही बळी पडलेल्यांसाठी तो अपघातच होता.
अनेक वर्षांनी जेव्हा अचानक एखादा शाळेतील सोबती किंवा कॉलेजातील मित्र/मैत्रीण भेटते तेव्हा तो देखील अपघातच असतो.
अनपेक्षित भेट ही जरी योगायोगानं होत असली तरी एके काळी हिंदी सिनेमांनी या योगायोगाचा अगदी चोथा करून टाकला होता. अपघातानंच नायक आणि नायिका भेटत असत. कॉलेजमध्ये सायकलींची टक्कर होऊन ते एकमेकांवर सुरुवातीला डाफरत पण नंतर प्रेमात पडत. बालपणी अपघातानं “बिछडलेले’ भाई-भाई पुन्हा अपघातानंच एकत्र येऊन शेवट गोड करतात. इतकंच काय पण अपघातानं दृष्टी किंवा वाचा गेलेला नायक किंवा नायिका पुन्हा अपघातानंच ती परत मिळवतात-किंवा क्वचित प्रसंगी अतिशय सहृदयी अशा सर्जनच्या कौशल्यानं! अपघातांचा इतका सढळ वापर कुठेही पाहायला मिळणार नाही!
पुण्यात कित्येक वर्षांपूर्वी “ऍक्सिडेंट’ असं नाव असलेला बंगला कुतूहल निर्माण करीत असे. असं बोललं जायचं की त्या बंगल्याच्या बांधकामाच्या वेळी पाया खोदताना मुद्रांनी भरलेला एक हंडा सापडला. हा एका अर्थी अपघातच होता आणि म्हणून बंगल्याचं ते नाव! गंमत म्हणजे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली तीही अपघातानंच असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
– श्रीनिवास शारंगपाणी