“गो फर्स्ट’ एअरलाइन्सने दिवाळखोरीसाठी अर्ज दिल्यानंतर भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात खळबळ उडणे स्वाभाविक असून या उद्योगावरचा दबावही अधोरेखित झाला आहे. भारतीय हवाई उद्योग हा या क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाचा आहे. मात्र सध्याच्या काळात वाहतुकीचा वाढलेला प्रचंड खर्च आणि पुरवठा साखळीत येणाऱ्या अडचणी यामुळे देशातील विमान कंपन्या अडचणीत येताना दिसताहेत. करोना काळातही या कंपन्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. उड्डाणे स्थगित करणारी गो फर्स्ट एअरलाइन ही काही शेवटची कंपनी असेल, असे दिसत नाही.
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या वाडिया समूहाच्या मालकीची असणाऱ्या गो फर्स्ट एअरलाइन कंपनीने तीन दिवस उड्डाणे स्थगित करण्याचा अचानक निर्णय घेतला. कारण ही कंपनी आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचली आहे. “एनसीएलटी’मध्ये इनसॉल्वेन्सी प्रोसिडिंगसाठी गो फर्स्ट एअरलाइनने अर्ज दिला आहे. आपल्याकडे तेल नाही आणि पैसाही नाही, असे गो फर्स्टने म्हटले आहे. अशा दूरावस्थेसाठी अमेरिकी इंजिन कंपनीला जबाबदार धरले आहे. परिणामी 50 टक्के विमाने जमिनीवरच असल्याचे म्हटले आहे.
गो फस्ट एअरलाइन्सने दिवाळखोरीसाठी अर्ज दिल्यानंतर भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात खळबळ उडणे स्वाभाविक असून या उद्योगावरचा दबावही अधोरेखित झाला आहे.
भारतीय हवाई उद्योग हा या क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाचा आहे. आगामी काळात याचा आणखी वेग येण्याची शक्यता आहे. हवाई क्षेत्राच्या विकासामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान राहात असून प्रादेशिक भागाला जोडण्याच्या योजनेर्तंगत दुर्गम भागही जोडले जात आहेत. या क्षेत्रात सुमारे 40 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात आणि भारतीय विमान कंपन्यांकडे 1100 विमाने आहेत. देशातील विमान कंपन्यांकडे दरवर्षी सरासरी शंभर विमानांची भर पडते. मात्र सध्याच्या काळात वाहतुकीचा वाढलेला प्रचंड खर्च आणि पुरवठा साखळीत येणाऱ्या अडचणी यामुळे देशातील विमान कंपन्या अडचणीत येताना दिसतात. करोना काळातही या कंपन्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले.
गो फर्स्टच्या मते, इंजिनची उपलब्धता नसल्याने कंपनीला दिवाळखोरीची घोषणा करावी लागली. “गो एअर’चे 25 एअरबस ए 320 निऑसच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याने त्यांना जमिनीवरच राहावे लागत आहे. परिणामी एकूण विमानांपैकी निम्मी विमाने बिघाडामुळे उड्डाणे करू शकत नसल्याचे चित्र आहे. अमेरिकी विमान उत्पादक कंपनी प्रॅट अँड व्हिटनीने पुरवठा साखळीत अडचणी आल्याने नवीन इंजिनचा पुरवठा करता येत नसल्याची कबुली दिली. अन्य विमान कंपन्या उदा. इंडिगो, एअर बाल्टिक, टर्किश एअरलाइन्स आदी कंपन्यांनी देखील विमान खराब होण्यामागे पी अँड डब्ल्यूचे इंजिनमध्ये असणारा बिघाड कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
गो फर्स्ट एअरलाइन कंपनीने पी अँड डब्ल्यूविरुद्ध खटला दाखल करून 8 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली. तसेच सिंगापूर इंटरनॅशनल एव्हिट्रेशन सेंटरच्या आदेशाचे पालन करावे अशीही मागणी केली आहे. या आदेशात 27 एप्रिल 2023 पर्यंत पी अँड डब्ल्यू कंपनीने किमान दहा इंजिन बदलून द्यावेत, असे म्हटले आहे. “गो फर्स्ट’वर आर्थिक आणि वाहतुकीपोटी सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. तीन दिवस उड्डाणे स्थगित केल्यानंतर पुन्हा उड्डाणे सुरू होत असतील तरीही ते पुरेसा पैसा गोळा करू शकणार नाही. यासाठी त्यांना सर्व उड्डाणे संपूर्ण क्षमतेने सुरू करावी लागतील. अर्थात अशा प्रकारची दिवाळखोरी जाहीर करणारी गो फर्स्ट ही पहिलीच भारतीय कंपनी नाही.
स्पाइसजेटचा एकूण तोटा 6 हजार कोटी रुपयांचा झाला आहे. परंतु त्याने 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत किरकोळ नफा मिळवला. जेट एअरवेजची मालकी बदलल्यानंतर पुन्हा उड्डाणे होऊ शकली नाहीत. या कंपनीवर नेमलेल्या हंगामी प्रशासकाने अलीकडेच पद सोडले आहे. सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे सुमारे 25 विमाने आजही जमिनीवरच आहेत. त्यांना पी अँड डब्ल्यू इंजिनच्या समस्येमुळे उड्डाणे घेण्यास अडचणी येत आहेत. मात्र त्यांच्याकडे सेवा सुरू ठेवण्यासाठी पुरेशी विमानसंख्या आहे. इंडिगो कंपनीचे आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आहेत. मात्र 2021, 2022 तसेच 2023 च्या पहिल्या सहामाहीत नुकसान सहन करावे लागले. एअर विस्तारा आणि एअर इंडियाची विमान सुरळीत असण्यामागे टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्सकडे असणारा बक्कळ पैसा.
आकाश एअर आणि फ्लाय 91 या सारख्या नवख्या कंपन्यांची विमान सेवा मर्यादित प्रमाणात आहेत. त्यांच्याबाबत विमान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी ठोस निष्कर्ष काढू शकत नाहीत. मार्च 2023 मध्ये हवाई क्षेत्राने करोनापूर्व स्थितीतील प्रवासी संख्या गाठली आहे. तूर्त हवाई वाहतुकीचा खर्च वाढला आहे. इंधनाच्या किंमती यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कच्च्या तेलाच्या किंमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. तरीही किंमती अधिकच आहेत. नजिकच्या भविष्यात इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
भारताचे हवाई क्षेत्र अनेक चढ उतारातून जात आहे. मोदीलुफ्त, ईस्ट वेस्ट, दमानिया यासारख्या कंपन्या सेवा सुरू ठेवण्यास अपयशी ठरल्या. किंगफिशर, एअर डेक्कन, सहारा एअरलाइन्स याचेंही “लॅडिंग’ झाले. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स ( त्यानंतर विलिनीकरण झाले) यांची विमान सेवा सुरू असून त्याचे नुकसान सरकार उचलत आहे. लक्षात ठेवा, प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी म्हटले, की उत्तर कॅरोलिनाच्या किटी हॉक येथे राइट बंधूनी पहिले विमान उडविले. तेथे एखादा दूरदृष्टी असणारा भांडवलदार हजर असता तर त्याने त्यांना गोळी घालून गुंतवणुकदारांच्या भविष्यातील पिढीवर मोठे उपकार केले असते. यातील काही भाग गमतीचा आहे. पण विमान उद्योगाने नेहमीच धक्के दिले. सध्याची स्थिती देखील नवीन नाही आणि उड्डाणे स्थगित करणारी गो फर्स्ट एअरलाइन ही काही शेवटची कंपनी असेल, असेही नाही.
– सत्यजित दुर्वेकर