करोनाचा धोका कमी झाला व संपूर्ण जगासह क्रीडा क्षेत्रानेही मोकळा श्वास घेतला. मात्र, करोनानंतर जगभरात विविध स्पर्धाही नव्या जोमाने सुरू झाल्या. या स्पर्धांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे या स्पर्धांमध्ये खेळत असलेले खेळाडू व त्यांची तंदुरुस्ती. खरेतर स्पर्धांच्या कुंभमेळ्यात सहभागी होत असलेले अनेक खेळाडू दुखापतींनी बेजार झालेले समोर आले तसेच तंदुरुस्तीसाठी मेहनत घेतानाही दिसले. म्हणूनच असे सांगावेसे वाटते की खेळाडू केवळ व्यस्त राहू नयेत तर तंदुरुस्तही हवेत तरच सरस कामगिरी होईल व त्याचे फळ विजयाच्या रूपात मिळालेले दिसेल.
ढोबळ मानाने आज क्रीडा क्षेत्राबाबत बोलायचे झाले, तर करोनापूर्व व करोनापश्चात असे दोन भाग पाडावे लागतील. करोनाच्या पूर्वी जगभरासह भारतातही ज्या स्पर्धा होत होत्या, त्यावर कोणतेही सावट नव्हते. खेळाडूंना मनमोकळेपणाने फिरता येत होते, अनेकांच्या गाठीभेटी घेता येत होत्या. मात्र, करोनाचा धोका सुरू झाला व क्रीडा क्षेत्र थांबले. यातून हा धोका संपत आला व पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले. मात्र, त्यावर बंधन होते ते बायोबबलचे.
प्रत्यक्ष करोनाच्या नियमांचा जितका जाच झाला नाही तो या बायोबबलचा झाला. खेळाडूंच्या सुरक्षेसाठीच ही उपाययोजना होती हे मान्य परंतु त्यात सातत्याने राहिल्याने खेळाडूंच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला आणि कधी नव्हे ते खेळाडूंच्या निराशेला मैदानावर वाट मिळाल्याचेही दिसून आले. त्यातच काही स्पर्धांमध्ये खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याने तर काही खेळाडूंना दुखापतींमुळे बेजार केले. आता करोनानंतरचा काळ पाहिला तर असे लक्षात येते की, गेल्या दोन वर्षांत झालेला तोटा भरून काढण्यासाठी प्रत्येक क्रीडा संघटनेने कंबर कसली व सातत्याने सामने व स्पर्धा सुरू झाल्या व खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा कस लागला.
फिटनेस प्रोग्रॅम हवा
इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत अशा एखाद्या मोठ्या संकटानंतर फिटनेस प्रोग्रॅम तयार केला जातो व सगळ्या खेळाडूंना त्यात बोलावले जाते. तिथे त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक तंदुरुस्तीवरही भर दिला जातो. खेळाडूंना नैराश्यातून बाहेर काढत मानसोपचार तज्ज्ञाकडून त्यांचे काउन्सिलिंग केले जाते. करोनानंतरही अशा अनेक देशांत हा उपक्रम राबवला गेला. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलनेही याचा उल्लेख केला होता.
करोनामुळे घरातच अडकून पडलेल्या मॅक्सवेलने आपल्याला या मानसिक धक्क्यातून सावरायला खूप वेळ लागल्याचेही सांगितले. मात्र, त्याचवेळी ऑस्ट्रेलिया क्रिकेट सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये किती लाभ झाला व मानसिकता कशी सुधारली हे देखील सांगत अशा सेंटर्सची किती गरज असते हे देखील अधोरेखित केले. आपल्याकडेही राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आहे व तिथे क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीकडे खूप गांभीर्याने घेतले जाते. अन्य क्रीडा क्षेत्रासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडेही (साई) अनेक योजना आहेत. मात्र, त्यात आता आधुनिकतेचा साज चढवला गेला पाहिजे व खेळाडू जर सातत्याने खेळत असतील, तर त्यांच्या तंदुरुस्तीकडेही सातत्याने लक्ष दिले गेले पाहिजे. त्यासाठी योजनाबद्ध फिटनेस प्रोग्रॅम तयार करणे काळाची गरज आहे.
म्हणून दुखापती लपवल्या जातात
खेळ कोणताही असो संघात निवडला गेलेला प्रत्येक खेळाडू मानसिक दडपणाखाली असतो. त्यातही भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अफाट स्पर्धा आहे. एका खेळाडूची जागा घेण्यासाठी कित्येकजण रांगेत असतात. त्यामुळे आपण जर आपल्या दुखापतीची माहिती दिली तर संघातील जागा तर जाईलच, पण आपल्या जागी संघात घेतलेल्या खेळाडूने सरस कामगिरी केली तर भविष्यातही संधी मिळणार नाही ही भीती खेळाडूंना असते, त्यामुळे अनेकदा दुखापती लपवल्या जात असल्याचेही समोर आले आहे. लोकेश राहुलचेच उदाहरण पाहिले तर याची सत्यता पटते.
मायदेशातील मालिकांमध्ये तसेच त्यानंतर झालेल्या आयपीएल स्पर्धेत अफलातून खेळ केलेल्या राहुलला दक्षिण आफ्रिका व आयर्लंड मालिकेसाठी नेतृत्व सोपवण्यात येणार होते. मात्र, त्याचवेळी त्याला दुखापत झाली व या दोन्ही मालिकांमधून माघार घेतली. त्याने उपचारांसाठी जर्मनी गाठली व आता त्याच्यावरील शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. मात्र, त्याला किमान एक महिना विश्रांतीची गरज आहे. यातून असे लक्षात येते की राहुलने आपली दुखापत लपवून जोवर शक्य आहे तोवर आयपीएल स्पर्धेत खेळ केला. मात्र, आता यापुढे आपण ही दुखापत लपवू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्याने याची माहिती बीसीसीआयला दिली. त्यानंतर बीसीसीआयची नाचक्की झाली व त्यांनी तडकाफडकीने ऋषभ पंतला व आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत हार्दीक पंड्याकडे नेतृत्व सोपवले. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, संघातील स्थानासाठी खेळाडू किती टोकापर्यंत लपवाछपवी करतात.
अन्य क्रीडा क्षेत्रातही पसरले लोण
क्रिकेटपटूंकडूनच प्रेरणा घेत देशातील विविध क्रीडा प्रकारांत खेळणारे खेळाडू देखील आता तंदुरुस्तीवर भर देतात मात्र, ते देखील आपल्या दुखापती लपवताना दिसतात. धावपटू हिमा दास, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, फुलराणी सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, मुष्टियोद्धा एमसी मेरीकोम या व अशा अनेक खेळाडूंनी सुरुवातीला आपल्या दुखापती जाहीर केल्या नाहीत. क्रिकेटपटूंकडून आता हे लोण अन्य क्रीडा क्षेत्रांतही पसरत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. खेळाडूंच्या तंदुरुस्ती योजनेवर लक्ष द्यायला हवे. त्यातच जगभरातील प्रख्यात फिटनेस तज्ज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ व क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञ यांची फौज सज्ज असली पाहिजे. आयपीएल स्पर्धेत पाहिले तर प्रत्येक संघासाठी अशी फौज तयार असते, मग आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी ही सज्जता का नसते? सध्या क्रीडा मानसशास्त्र व क्रीडा दुखापतींचे तज्ज्ञ डॉक्टर यांना सुगीचे दिवस आले आहेत. दुखापत कोणतीही असो त्याची सत्यता पडताळून पहिली जावी, खेळाडूंचे काउन्सिलिंग केले जावे. दुखापती लपवण्याचे लोण क्रिकेटपासून तळागाळातील क्रीडा प्रकारांमध्ये पसरू नये इतकीच अपेक्षा आहे.
पर्याय वेळेवर शोधले जावे
करोना काळात किंवा त्यानंतर ज्या स्पर्धा खेळल्या गेल्या किंवा खेळल्या जात आहेत तसेच अनेक स्पर्धाही होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक खेळाच्या संघटनांनी आपल्या मूळ संघाबरोबरच सेकंड बेंचही सज्ज केले पाहिजेत. आज क्रिकेटचे उदाहरण पाहिले तर आपण सध्या दोन संघ खेळवत आहोत. एक संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळला तर दुसरा संघ आधी श्रीलंकेत नंतर आयर्लंडला नंतर इंग्लंडविरुद्धही खेळला. म्हणजेच आयपीएलमुळे म्हणा किंवा भारतीय क्रिकेटच्या योजनाबद्ध निकषांमुळे म्हणा भारतीय संघात जवळपास 60 ते 70 खेळाडू असे आहेत की जे भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या क्षमतेचे आहेत. हाच भक्कम सेकंड बेंच सगळ्याच क्रीडा प्रकारांत दिसले पाहिजेत. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पंत असतानाही दिनेश कार्तिक, इशान किशन, श्रीकर भरत असे अनेक पर्याय समोर आहेत. आता हेच टेनिस, फुटबॉल, बॅडमिंटन, मैदानी स्पर्धा तसेच अन्य ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातही दिसले पाहिजे.
आर्थिक सज्जताही असावी
खेळाडूंच्या दुखापती समोर येत असल्याने किंवा लपवाछपवी होत असल्याने आता क्रिकेटसह सर्व क्रीडा संघटनांनी या खेळाडूंना निधीची कमतरता जाणवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक खेळाडू दुखापती सांगितल्या तर संघातील स्थान जाईल व आर्थिक फटकाही बसेल या चिंतेत असतो. त्यामुळे बीसीसीआय काय किंवा कोणतीही अन्य क्रीडा संघटना काय त्यांनी आपल्या खेळाडूंना आर्थिक समस्या राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जर खेळाडूचे नुकसान होणार नाही ही हमी दिली तर खेळाडू निश्चिंत होतील व कोणतीही लपवाछपवी न करता आपल्या तंदुरुस्तीची तसेच दुखापतींची माहिती द्यायला घाबरणार नाहीत. यामुळे संघटनेची गुणवत्ता तर वाढेलच पण खेळाडूंची कारकीर्दही वाचेल. असो, अखेरीस इतकेच सांगावेसे वाटते की खेळाडू विविध स्पर्धांमध्ये व्यस्त राहावेत हीच केवळ अपेक्षा राहू नये तर ते तंदुरुस्तही राहावेत याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
अमित डोंगरे